-अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली : सरकारने एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम या दोन सरकारी मालकीच्या कंपन्या विक्रीसाठी काढल्या असून येत्या मार्च महिन्या पर्यंत त्यांची विक्री प्रक्रिया पुर्ण केली जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.
एअर इंडियाचा सध्या संचित तोटा 58 हजार कोटी रूपयांवर गेला आहे. तथापी भारत पेट्रोलियम कंपनी मात्र बऱ्यापैकी पैसा कमावणारी कंपनी आहे. या कंपनीचे मार्केट व्हॅल्युनुसार भांडवल 1 लाख 3 हजार कोटी रूपये इतके आहे. या कंपनीतील भारत सरकारच्या मालकीचे शेअर्स विकले जाणार आहेत त्यातून सरकारला 63 हजार कोटी रूपये मिळतील अशी अपेक्षा आहे.
एअर इंडियाच्या विक्रीतून नेमके किती पैसे मिळतील ही माहिती मात्र अजून उपलब्ध झालेली नाही. मात्र या कंपनीच्याही मालमत्ता मोठ्या आहेत. सध्या एअर इंडिया ही कंपनी चालवण्यासाठी वर्षाला 4300 कोटी रूपये इतका खर्च येतो तो खर्च भागवणे सरकारला शक्य होईनासे झाले आहे. त्यामुळे त्या कंपनीच्या विक्रीला कोणाची आडकाठी नसली तर भारत पेट्रोलियम ही कंपनी सरकारने का विकायला काढली आहे याविषयी अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.