नगर: राज्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे. राज्य सरकारने दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली, मात्र शेतकऱ्यांना अजूनही सरकारी अनुदान मिळालेले नाही. नगर जिल्ह्यात तर चारा छावण्या सुरू करून दोन महिने उलटून गेले, तरी छावणी चालकांना अद्याप देयके मिळालेली नाहीत, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.
नगर येथे ६७ छावण्यांमध्ये ४० हजार जनावरांसाठीचा दैनंदिन चारा, पशुखाद्य आदीचा खर्च भागवणे अवघड झाल्याने शेतकरी आणि छावणी चालक हवालदील झाले आहेत. सरकारी अनुदानासाठी संस्थाचालक जिल्हाधिकारी कार्यालयात सतत हेलपाटे मारत आहेत. कित्येक निवदने देऊन सुद्धा राज्य सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपा काढत आहे. अशीच उदासीनता कायम राहिली तर जनावरांसाठी चारा छावण्या चालवणे कठीण होऊन बसेल. याप्रसंगी जनावरांचा चारा व पाणी टंचाईचा प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारने चारा छावण्यासाठी १० मे पूर्वी देयके द्यावीत अन्यथा नाईलाजाने चारा छावण्या बंद कराव्या लागतील, असा इशारा छावणी चालकांनी दिला आहे.