शिर्डी – उध्दव ठाकरे यांचे राज्यातील दौरे ही केवळ नौटंकी असून, मुख्यमंत्री असतानाही कोकणातील जनतेच्या तोंडाला त्यांनी पाने पुसली होती. पक्ष आणि आमदारही गमावलेल्यांकडे आता फक्त व्यक्तिद्वेषाची भाषणं शिल्लक आहेत. रोज सकाळी उठून बोलण्याचा संजय राऊतांचा वारसा आता उध्दव ठाकरेंनी स्वीकारला असल्याची टीका महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराच्या निमित्ताने नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, यापूर्वी सुध्दा उध्दव ठाकरे यांनी कोकणाचे दौरे केले परंतु तेथील जनतेला ते काही देऊ शकले नाहीत. आत्ताही ते व्यक्तिद्वेषाच्या भाषणापलीकडे काहीही देऊ शकणार नाहीत. कारण सत्ता गेल्याच्या वैफल्याने ते ग्रासले आहेत. त्यामुळे त्यांचे व्यक्तिद्वेषाची भाषा कोणालाही ऐकायला आता वेळ नाही.
राज्यातील त्यांचे दौरे ही फक्त नौटंकी असून, जनतेसाठी ठाकरे गटाकडे आता कोणताही कार्यक्रम शिल्लक राहिलेला नाही, जनतेलाही ते काही देऊ शकणार नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारांनी वाढलेला पक्ष उध्दव ठाकरे यांनी केव्हाच गमावला. त्यांच्या पक्षाचे आमदारही त्यांना सोडून गेले. त्यामुळे व्यक्तिद्वेषाच्या भाषणापलीकडे त्यांच्याकडे काहीही शिल्लक नाही, असा टोलाही मंत्री विखे पाटील यांनी लगावला.
देशामध्ये इंडिया आघाडीकडे नेतृत्व करायला एकही नेता आता शिल्लक नाही. प्रत्येकजण आता वेगळी भूमिका घेऊन इंडिया आघाडीतून बाहेर पडू लागला आहे. इंडिया आघाडीने कितीही प्रयत्न केले तरी, देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील जनतेची काळजी करण्यास विश्वनेते नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व सक्षम आहे. इंडिया आघाडीचे उरले सुरले अस्तित्व आता संपलेलं आहे. वेगवेगळ्या राज्यात इंडिया आघाडीतील नेत्यांमध्येच मतप्रवाह उघड झाले असल्याने त्याची काळजी आघाडीच्या नेत्यांनी करावी, असा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी दिला आहे.
राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्व महसूली विभागांमध्ये आत्तापर्यंत ३ कोटी ११ लाख ६३ हजार २४१ कुटुंबांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले असून, आयोगाच्या निर्देशाप्रमाणे २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत माहिती भरण्याचे काम सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व विभागांची यंत्रणा तसेच महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्तम कार्यामुळेच हा डाटा उपलब्ध होऊ शकला. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने ही माहिती उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.