अकोले – भंडारदारा आणि निळवंडे धरणाच्या उभारणीसाठीअकोलेकरांनी केलेला त्याग खूप मोठा आहे. धरण आणि कालव्यांच्या कामासाठी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचा पुढाकार कोणीही नाकारू शकणार नाही. जलनायक कोणीही होत असले तरी “नथनीच कौतुक करून घेणाऱ्यांनी नाक देणाऱ्याला विसरू नये” असा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाव न घेता आमदार थोरात यांना लगावला. डाव्या कालव्याप्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा शब्द महायुती सरकारने पूर्ण केल्याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.
अयोध्येमधील प्रभू श्रीराम मूर्ती स्थापनेच्या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून निळवंडे धरणांच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. ज्येष्ठ नेते मधुकरारव पिचड खा.डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड, सीताराम गायकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदा विभागाचे बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे यांच्यासह लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव देण्याची घोषणा मंत्री विखे पाटील यांंनी केली.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, धरणाचे आणि कालव्याचे काम अकोले तालुक्यात होते पण खालच्या भागातच आंदोलन सुरू होती. धरण आणि कालव्यांचे काम पूर्ण होण्यासाठी मधुकरराव पिचड यांचे योगदान खूप मोठे आहे. या भागातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या नसत्या तर प्रकल्प सुध्दा उभा राहू शकला नसता. या भागातील शेतकऱ्यांच्या त्यागामुळेच भंडारदारा, निळवंडे प्रकल्प उभे राहिले. या कामाचे श्रेय घेऊन कोणीही जलनायक, खलनायक होत असले तरी नथनीचे कौतुक करणाऱ्यांनी नाक देणाऱ्याची आठवण ठेवावी, असा टोला विखे पाटील यांनी आ. थोरातांना लगावला.
डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यातील काही गावांत शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. त्यांच्या नूकसान भरपाईचे प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून या नुकसानीची मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करणार आहे. शेतकऱ्यांच्या दळवळणाकरीता १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरवा करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेऊन अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभे राहिले आहेत. मधुकर पिचड यांनी काय केले असा प्रश्न करणाऱ्यांचा त्यांनी समाचार घेतानाच तालुक्यात झालेले काम हीच कामाची साक्ष असल्याचे सांगून पुढच्या पिढीने या कामाचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड यांची भाषण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले.
पाणी सोडण्याचा कार्यक्रम योगायोग
रामायणात महर्षी अगस्ती ॠषी आणि प्रभू श्रीरामांच्या झालेल्या भेटीचा संदर्भ देऊन विखे पाटील म्हणाले की,आज योध्येचा ऐतिहासिक कार्यक्रम आणि अगस्ती ॠषीच्या भूमीत होत असलेला पाणी सोडण्याचा कार्यक्रम योगायोग असल्याचे त्यांनी सांगितले.
कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव
रामनामचा जयघोष करीत उजव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले. कालव्यावरील पुलाला श्रीराम जलसेतू नाव देण्यात आल्याची घोषणाही विखे पाटील यांनी करून या नावाला राज्य सरकार तातडीने मान्यता देईल. प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.