नेवासा -महात्मा गांधी जयंतीनिमित्त “एक तारीख एक तास स्वच्छता अभियान’ उत्साहात साजरे करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत अन् शाळकरी विद्यार्थ्यांपासून आबालवृद्धांपर्यंत स्वच्छता अभियानात सर्वांनीच सहभाग नोंदविला.
काही ठिकाणी स्वच्छता अभियान केवळ फोटोसेशनपुरतेच साजरे झाले. त्यामुळे बापूंच्या जयंतीनिमित्त “माफ करा बापू पण… आम्ही केवळ स्वच्छता अभियानापुरतेच फोटो टाकू!’ अशी खिल्ली या अभियानादरम्यान उडविली जात आहे ही खिल्ली उडविली जात असताना तुंबलेल्या गटारी, कचऱ्यांचे ढीग व दुर्गंधीचे छायाचित्रणही सर्रास दाखविले जात आहे.
एकीकडे सरकार स्वच्छतेसाठी मोठा खर्च करत असताना दुसरीकडे मात्र शहरापासून खेड्यांपर्यंत ही समस्या जैसे थेच राहत असल्यामुळे सरकारचा स्वच्छतेसाठी होणारा खर्च वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे वाया जात आहे. या दुर्गंधीमुळे साथीचे रोग पसरून आरोग्याचा ज्वलंत प्रश्न उभा राहू शकतो. याकडे किमान बापूंच्या जयंतीपासून जर नियमित स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता करण्याचे काम करून घेतले तर रोगराई नष्ट होण्यात काही प्रमाणात नक्कीच मदत होणार असल्याचेही बोलले जात आहे.