शिल्पा रसाळ
नगर – वाद नको, संवाद हवा…, चला, नाती टिकवू या… असा संदेश देत आणि माणूस म्हणून जगूया माणुसकी जपून घ्या असं विश्वास निर्माण करेल तर रविवारी माणुसकीची शाळा नामक एक अनोखी शाळा भरते. 191 वी शाळा या रविवारी (दि.15) भरणार आहे.
दर रविवारी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत ही अनोखी शाळा सुरेश नाईकवाडी नावाचे गुरुजी घेतात.
या शाळेची द्विशतकाकडे वाटचाल सुरु आहे. शाळेचा प्रारंभ ‘हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या प्रार्थनेने होतो. यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले जाते. तसेच एखादे काम करण्यासाठी जिद्द, सचोटी, चिकाटी कशी निर्माण करता येईल एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल, आपल्या स्वतःतील गुणांची ओळख कशी केली जावी, माणसाची पारख त्याच्या वर्तनातून होते. आपले वर्तन कसे असावे, आत्मविश्वास कसा निर्माण होईल याबद्दल नाईकवाडी मार्गदर्शन करतात.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणूस माणुसकी विसरत चालला आहे, आपण एकत्र कुटुंबाकडून विभक्त कुटुंबाकडे आलो आहोत. परस्परांतील संवाद हरवत चालला आहे. माणूस समाजशील प्राणी आहे. कौटुंबिक व सामाजिक मूल्य याविषयी या माणुसकीच्या शाळेमध्ये धडे दिले जातात. माणुसकीच्या शाळेचा एक भाग म्हणजे क्रांतीपर्व होय. क्रांतीपर्व मध्ये देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या क्रांतीवीरांची माहिती दिली जाते. माणुसकीच्या शाळेचा दिनविशेष हा एक घटक असतो.
यामध्ये पुढच्या आठवड्यात प्रत्येक दिवसाचे व तारखेचे महत्त्व काय याबद्दल विवेचन केले जाते. तसेच या ऑनलाइन शाळेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणीच्या विद्यार्थ्यांना आपले मत विचार मांडण्याची संधी दिली जाते. तसेच विविध क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तींच्या कार्याची महती सांगितली जाते. परस्परांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वृद्धिंगत होण्यासाठी एक बोधपर गोष्ट माणुसकीच्या शाळेत नाईकवाडी सांगतात. कधी विद्यार्थी देखील अशी गोष्ट सांगू शकतात.
सुरेश नाईकवाडी दर शनिवारी संध्याकाळी शाळेचीलिंक पाठवतात. आणि रविवारी संध्याकाळी सहा ते सात या वेळेत माणुसकीची शाळा ऑनलाईन भरते. ही शाळा युट्यब लाईव्ह होत असते. या शाळेचा अनेक कुटुंबांनी ऑनलाइन लाभ घेतला असून, त्यांना फायदा झाल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून सांगितले.