नगर – महाविद्यालया जवळील पान टपरी हटविण्याबाबत तक्रार केल्याच्या कारणावरून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- साहित्यिक व सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोघे अद्याप फरार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहे.
अक्षय विष्णु सब्बन (रा.दातरंगे मळा), चैतन्य सुनिल सुडके यांना अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. तर अक्षय व, सनी जगधने (पूर्ण नाव माहित नाही) दोघे फरार आहेत. प्रा.कुलकर्णी यांच्यावरती शनिवारी (दि.7) रोजी दुपारी साडे बाराच्या सुमारास सावेडीतील प्रेमदान हाडको परिसरात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत असलेले सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी यांनाही मारहाण झाली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्ला झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह तोफखाना पोलिसांकडून त्यांचा हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार चैतन्य सुनिल सुडके (रा. सुडकेमळा) याने व त्याच्या साथिदाराने केला असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे शाखेचे गणेश वारुळे, हेमंत थोरात, सोपान गोरे, संदीप पवार रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, दत्ता हिंगडे, लक्ष्मण खोकले, संभाजी कोतकर, सचिन अडबल, सचिन रणशेवरे, दत्तात्रय जपे, शिरीश तरटे आदींच्या पथकाने कारवाई केली.