पुणे – खासगी स्पर्धकांच्या संख्येत वाढ झाली असली, तरी टपाल खात्यावरील विश्वासार्हतेमुळे दरवर्षी “स्पीड पोस्ट’ सुविधेला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद वाढत आहे. पुणे टपाल विभागाने केलेल्या कागदपत्रांच्या टपाल वाहतुकीमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 72 टक्के तर पार्सल सेवेत 63 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
युनिव्हर्सल पोस्टल युनियनच्या वर्धापनदिनानिमित्त भारतीय टपाल विभागाच्या वतीने राष्ट्रीय टपाल सप्ताह साजरा करण्यात येतो आहे. “विश्वासार्हता जपण्यासाठी एकत्र येऊ या’ ही मध्यवर्ती संकल्पना सप्ताहासाठी निवडण्यात आली आहे. याविषयी पोस्टमास्तर जनरल रामचंद्र जायभाय यांनी माहिती दिली.
मुख्य टपाल कार्यालयात आधुनिक पद्धतीची दर्जेदार पॅकेजिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. टपाल, पार्सल सेवेबरोबरच आर्थिक गुंतवणुकीच्या सर्व योजना, अपघात विमा योजनांना नागरिकांचा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. आधारकार्डातील बदल सुविधा सर्वाधिक लोकप्रिय झाली आहे. पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र वाढविण्याची मागणी नागरिक करत असून त्यासंदर्भात विचार केला जाईल, असे जायभाय यांनी सांगितले.
पुण्यामध्ये टपाल विभागाचे मुख्यालय, चिंचवड, गणेशखिंड आणि पर्वती या भागांत तसेच सोलापूर, नगर आणि सातारा जिल्ह्यात “डाक घर निर्यात केंद्र’ कार्यरत आहेत. या केंद्रांमार्फत शेतकरी, लघुउद्योजक, व्यावसायिक त्यांची उत्पादने परदेशात पाठवतात. याला प्रतिसाद वाढतो आहे. निर्यात केंद्रांची वाढती मागणी लक्षात घेऊन टप्प्याटप्याने प्रत्येक टपाल कार्यालयामध्ये केंद्र सुरू करण्याचा टपाल विभागाचा विचार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
बाणेरसाठी नवा पिनकोड
औंध, बाणेर, पाषाण, बालेवाडी परिसराचा झालेला विस्तार लक्षात घेऊन गेल्या महिन्यात आम्ही बाणेरमध्ये उप टपाल कार्यालय सुरू केले. बाणेरसाठी आता 411-069 हा नवा पिनकोड मिळाला आहे. लवकरच बावधन आणि सहकारनगर भागालाही नवीन पिनकोड मिळणार आहेत, असे जायभाय यांनी सांगितले.