वरुणराजाच्या कृपेवर ज्वारीचे भवितव्य अवलंबून
वाल्ह्यात ज्वारीचा पेरा घटतोय
पेरणीत बळीराजा गुंतला
वाल्हे – उशिरा आलेल्या मान्सूनने यंदा सरासरी गाठलीच नाही. जितका पडला तितक्याच पावसावर पुरंदर तालुक्यातील बळीराजा रब्बीच्या पेरणीत गुंतला आहे. सध्या मॉन्सून परतल्याचे चित्र आहे. मात्र, 12 नोव्हेंबरपासून स्वाती नक्षत्राच्या पावसावरच ज्वारीचे भवितव्य आहे. दरम्यान, वाल्हे परिसरात गेल्या तीन वर्षांपासून ज्वारीचा पेरा घटला हे मात्र निश्चित!
यावर्षी वाल्हे व परिसरात पाऊस कमी झाल्याने, शेतकरीवर्गापुढे कमी पाण्याचे पीक घेण्याचे संकट ओढवले आहे. तसेच, वातावरणातील बदलाचा विपरीत परिणाम शेतीवर आणि पर्यायाने पिकांवर होत आहे. पावसानंतर मागील काही दिवसांपासून ढगाळ हवामान होत असून मागील आठवड्यापासून, पहाटे थंडीची लाट व दिवसभर ऊन्हाचा चटका वाढला आहे, अशा वातावरणामुळे या परिसरातील आहे ते जलस्त्रोत लवकरच संपुष्टात येण्याची भीती शेतकरीवर्गामधून व्यक्त होत आहे. वाल्हे व परिसरात यावर्षी,
पाऊस दरवर्षी पेक्षा खूप कमी झालेला आहे. या कारणामुळे परिसरातील शेतकरीवर्गाने पिकांच्या पाण्याचे नियोजन करून, यावर्षी, ज्वारीच्या पेरणीस लवकरच सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांनी धान्यांची अपेक्षा न करता, जनावरांना चाऱ्यासाठी बाटूक किंवा कडबा तरी मिळावा या अपेक्षेने ज्वारीची पेरणी शेतकरीवर्ग करीत आहेत. कदाचित पुढील काही दिवसांत पाऊस पडलाच तर, किमान जनावरांना चाऱ्यापुरते तरी ज्वारीचे बाटूक उपयोगी पडेल अशी आशा शेतकरीवर्गाला लागली आहे.
इतर पिकांचे क्षेत्र वाढले
गेल्या काही वर्षांपासून जरी ज्वारीचे क्षेत्र कमी झाले असले तरी, पाऊस चांगला झाल्याने, कांदा, हरभरा, गहू, फळबाग आदी पिकांचे क्षेत्र वाढले होते. तसेच, परतीच्या पावसाने खरिपाचे होत्याच नव्हते करून टाकले होते. शेतकरी कसाबसा या अस्मानी सकंटातून सावरत काही प्रमाणात रब्बीची पेरणी, तसेच, ऊस लागवडीकडे शेतकरीवर्ग जास्त प्रमाणात वळलेला होता.
साडेपाच ते सहा हजार रुपये क्विंटल
सध्या ज्वारीला साडेपाच ते सहा हजार रुपये क्विंटल इतका विक्रमी दर आहे. मागील अनेक वर्षात पडलेला ज्वारीचा दर सध्या चांगलाच वाढला आहे. यामुळे स्वाती नक्षत्राने साथ दिल्यास शेतकऱ्यांना यंदाची दुष्काळ सदृश स्थितीही इष्टापत्ती ठरू शकते.