पारनेर -तालुक्यातील सुपा शहरातील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कचरा प्रश्न पाडव्याच्या मुहूर्तावर मार्गी लागला आहे. या कचरा संकलन कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच मनीषा योगेश रोकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दत्तानाना पवार, योगेश रोकडे, माजी उपसरपंच सागर मैड, चेअरमन दिलीप पवार, पप्पू पवार, कानिफ पोपळघट, विलास पवार, प्रताप शिंदे, सुरेश नेटके, अनिता पवार, बाळासाहेब पवार, अमोल मैड, वैभव काळे, अमोल पवार, संचित मगर, प्रवीण सुपेकर, कृष्णा कोल्हे, गणेश पवार मेजर आदी उपस्थित होते.
सुपा ग्रामपंचायतीतर्फे पूर्वी पवारवाडी येथे कचरा टाकण्यात येत होता. मात्र, याचा ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर हे संकलन थांबविण्यात आले. जागेअभावी गेली दोन वर्षे घंटागाड्या बंद होत्या. सुपा-पारनेर रस्ता, सुपा बसस्थानक, बाजारतळ, सुपा-वाळवणे रस्ता, नगर-पुणे महामार्ग आदी ठिकाणी कचऱ्याचे मोठ मोठे ढीग लागले होते. या दरम्यान कचरा गाड्या चालू कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी वारंवार केली. मात्र, कचरा संकलन करण्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने हा प्रश्न जैसे थेच होता. सुप्यात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते.
सरपंच रोकडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी कचरा संकलन करण्यासाठी सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये जागा उपलब्ध केली. याठिकाणी सुका कचरा, ओला कचरा वेगळा करून त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांसह व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.