राहुरी -डॉ. तनपुरे कारखाना सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत जिल्हा बॅंकेने ताब्यात घेणे बेकायदेशीर असून, निवडणुका त्वरित घेऊन कारखान्याचे संचालक मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याची माहिती ज्येष्ठ विधिज्ञ व शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे यांनी दिली.
राहुरी येथे कारखाना बचाव कृती समितीसमवेत आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. काळे यांनी कारखान्याबाबत चालू असलेल्या कायदेशीर लढाई व इतर कामकाजाची माहिती दिली. या वेळी ऍड. पंढरीनाथ पवार, बाळासाहेब गाडे, सुखदेव मुसमाडे, विजय कातोरे, भगवान गडाख, मधुकर तारडे, कारभारी ढोकणे, अशोक ढोकणे, बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते.
ऍड. काळे म्हणाले की, तत्कालीन प्रशासकाने 2016मध्ये डीआरटी न्यायालयाची याचिका काढून घेतली हीच मोठी बेकायदेशीर गोष्ट असून, त्यानंतर बॅंकेने कारखाना ताब्यात घेतला. कारखान्याची निवडणूक होऊन त्यानंतर आलेल्या संचालक मंडळाकडून वैयक्तिक व सामूहिक हमी मुद्रांकावर घेऊन बॅंकेने कर्जाचे पुर्नगठन केले होते. त्यानुसार बॅंकेने संचालक मंडळाला याबाबत जबाबदारी निश्चितीची नोटीसही काढली. परंतु राजकीय दबावाने पुन्हा ही जबाबदारी कारखान्यावरच असल्याची नोटीस बॅंकेने काढली. 25 वर्षांच्या भाडेतत्त्व कराराला प्रतिसाद दिसत नाही. त्यातून वेळकाढूपणा करून राजकीय परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा येथे येऊन बसण्याचा काहींचा मनसुबा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांकडून 36 लाख रुपये निवडणूक निधी उभा करावा लागेल. मागील संचालक मंडळाने तीन हंगाम विनापरवाना गाळप केले. याचा 60 कोटींच्या आसपास भुर्दंड कारखान्यास बसला. बेकायदेशीर चोरीच्या मुरूम उत्खनानातून 55 कोटींचा दंड कारखान्यावर लादला गेला. याला जबाबदार कोण? या सर्व भ्रष्टाचारी कारभारातून कारखाना डबघाईस आणणारे हे कोण? हे शेतकऱ्यांना विचारावे लागेल. असे आवाहन करतानाच कारखाना वाचविण्यासाठी सर्व लढाई कारखाना बचाव कृती समितीबरोबर राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. रावसाहेब करपे यांनी विविध कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. समितीचे अमृत धुमाळ, राजूभाऊ शेटे आदींनी कायदेशीर व इतर लढाईबाबत माहिती दिली.
विखेंकडून फक्त लूटच!
विखेंनी गणेश व डॉ. तनपुरे कारखान्यासाठी काहीच न करता फक्त लूट केली. दोन्ही कारखान्यांकडे आमचेच कोट्यवधींचे येणे असल्याचा कांगावा केल्याचा आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी निवडणुकीतून समविचारी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हे गौडबंगाल बाहेर काढावे लागेल, असे आवाहन अरुण कडू यांनी केले.