– अरुण गोखले
माणूस प्रपंच्यात असो नाही तर परमार्थात. त्याला व्यवहार हा कुठेच चुकत नाही. व्यवहार म्हटला की मग तिथे देणे आणि घेणे या दोन्ही गोष्टी आपोआप येतातच, नव्हे या व्यावहारिक जगात दिल्या घेतल्या शिवाय कोणी कोणाला काही देत नाही, काही मिळत नाही. मग ते नोकरी, धंद्यासाठी केलेले काबाडकष्ट असोत, शेतात गाळलेला घाम असो,
कुटुंबाच्या सुखासाठी खाल्लेल्या खस्ता असोत किंवा विद्यार्जनासाठी केलेली गुरूसेवा असो. पण त्या प्रपंच आणि परमार्थात फरक इतकाच आहे की माणसाच्या प्रापंचिक मागण्या किंवा त्यासाठी त्याचे जे काही देण्या-घेण्याचे व्यवहार होत असतात त्यापासून त्याला खरं सुख, खरं समाधान, आनंद हा मिळत नसतो, तर जे मिळाले असे वाटत असते ते सारे क्षणिक असते.
यासाठीच त्या परमार्थातल्या दात्याकडे, त्या भगवंताकडे, विठ्ठलाकडे तुम्ही कशाची नेमकी मागणी करा आणि त्यास काय द्याल हे सांगताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे आपल्याला हेच सांगतात की- बाबाहो! तुम्ही काय करा त्या भगवंताची नित्य न विसरता पूजा करा. त्यास काय अर्पण करा आणि काय मागा तर –
देवास काय अर्पण करायचे आणि त्या बदल्यात काय मागायचे किंवा काय मिळवायचे? ते सांगताना महाराज त्यांच्याच एका सुंदर अशा अभंगात असे सांगतात की, मनरुपी मोगरा हा त्या देवाला अर्पण करा आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडे कोणती मागणी करा! तर त्याला म्हणावं, देवा! तू आम्हाला तुझ्या जवळ असं स्थान दे की आम्हाला पुन्हा या संसारात येणे लागू नये.
मनरुपी शेवंती ही त्या हृषिकेशास अर्पण करायची. कारण पुन्हा या जीवास तो गर्भवास, ते जन्माचे कष्ट यातना भोगाव्या लागू नयेत. मन रुपी तुळस ही त्या देवास अर्पण करायची का? तर या जन्म मरणाच्या रहाट गाडग्यातून हा जीव सुटावा.
त्याला जीवन मुक्तीचा आनंद मिळावा. तुकाराम महाराज म्हणतात, त्या देवाची मनोमन भाव पूजा करताना तुम्ही त्याच्याकडे हेच मागणे मागा की- देवा! या प्रकारे तू माझ्या हातून तुझी पूजा करवून घे आणि माझ्या प्राप्त जन्माचे मला सार्थक साधून घेऊ दे.