शेवगाव -दीपावलीचा सण तोंडावर येऊन ठेपला असूनही येथील लाभधारक अद्याप आनंदाचा शिधाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यातील प्राधान्य कुटुंब कार्ड लाभधारक 32 हजार 766 व अंत्योदयचे 9 हजार 756 अशा एकूण 39 हजार 885 लाभधारक कार्डधारकांसाठी आजअखेर केवळ 37 हजार आनंदाचा शिधा संच शेवगाव पुरवठा विभागात प्राप्त झाला आहे.
त्यातही लाभधारकाला शंभर रुपयात वाटप करावयाच्या साखर, पामतेल, हरभरा डाळ, रवा, मैदा, पोहे या वस्तूंपैकी काही वस्तू अद्यापपर्यंत उपलब्ध झाल्या नसल्याची माहिती समजली. त्यामुळे तालुक्यात आनंदाचा शिधावाटपास केव्हा सुरवात होणार? याबाबत साशंकता आहे.
राज्य सरकारने याबाबत सुमारे एक महिन्यापूर्वी या उपक्रमाची मोठा गाजावाजा करत प्रसिद्धी केली. दीपावलीसारखा महत्त्वाचा सण तोंडावर येऊन ठेपला असताना या उपक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी या वा त्या कारणाने लांबणीवर पडली आहे. गोरगरीब कुटुंबीयांना आनंदाचा शिधाची प्रतीक्षा लागली आहे.
गौरी-गणपतीच्या कालावधीत साखर, हरभरा डाळ, पामतेल व रवा या चार वस्तूंचा प्रत्येकी एक किलोचा आनंदाचा शिधा संच प्राधान्य व अंत्योदय योजनेच्या प्रत्येक लाभार्थीला शंभर रुपयांत वाटप करण्यात आला. दिवाळीसाठी प्रत्येकी अर्धा किलो मैदा व पोहे वाढविण्यात आले. मात्र, पूर्वीच्या शिधा संचामधील रवा व हरभरा डाळ या वस्तूमध्ये प्रत्येकी अर्धा किलो कपात केली. हे सर्वसामान्यांना पटले नाही. राज्य सरकारच्या सवंग लोकप्रियतेच्या या निर्णयाचा जनतेच्या दृष्टीने लाभ नाही.
प्रीतम गर्जे,शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, शेवगाव