वृत्तपत्रीय स्वातंत्र्यावर यापुढे कोणीही घाला घालणार नाही
नवी दिल्ली, दि. 1 – वृत्तपत्रीय स्वातंत्र्य सुरक्षित राहावे म्हणून वृत्तपत्रांना घटनात्मक संरक्षण दिले जाईल अशी घोषणा पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी आज केली. ते पुढे म्हणाले, वृत्तपत्रांवर कोणतेही निर्बंध कोणीही लादू शकणार नाही. इकडे सरकार लक्ष देईल. वृत्तपत्रे आता स्वातंत्र्य उपभोगीत आहेत. वृत्तपत्रांना जे वाटते ते लिहिण्यात ती स्वतंत्र आहेत.
एवढेच की त्यांनी देशाच्या कायद्याचा भंग करू नये. त्याचवेळी वृत्तपत्रांनी हिंसाचाराचा प्रचार करू नये. वृत्तपत्रांनी सरकारला अडचणीत आणून त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे व्यवहारात सरकारने हस्तक्षेप करता कामा नये, असे माझे मत आहे. कारण सरकारच्या कारभारावर टीका करणे हे त्यांचे कामच आहे.
4 वर्षांत दारूबंदी
नागपूर – येत्या 4 वर्षांत महाराष्ट्रात दारूबंदी जारी करावी अशी सूचना केंद्राने राज्य सरकारला केली आहे. तीवर राज्य सरकार विचार करीत आहे, असे दारूबंदी मंत्री राख यांनी विधिमंडळात प्रश्नोत्तराचे वेळी सांगितले.
हिंदविषयी अमेरिकन दृष्टिकोनात बदल
नवी दिल्ली – भारताबद्दल अमेरिकेचा जो दृष्टिकोन होता, त्यात आता लक्षणीय बदल झाला आहे, असे परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले आहे. आपल्या मंत्रालयाशी संलग्न अशा सल्लागार समितीच्या बैठकीत बोलताना अटलबिहारी वाजपेयी पुढे म्हणाले, की भारत-अमेरिका सहकार्य अधिक वाढेल, असा सरकारला विश्वास वाटत आहे.