श्रीगोंदा – कुकडी डाव्या कालव्याची दोन आवर्तने सोडण्यात येणार असून, त्यापैकी रब्बीचे आवर्तन दि. 15 डिसेंबरपासून, तर उन्हाळ्यात एक आवर्तन सोडण्यात येणार आहे. घोडच्या डाव्या कालव्याला रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळ्यात एक अशी तीन आवर्तने सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आगामी काळात किती पाऊस पडतो याआधारे या वेळापत्रकात लवचिकता ठेवण्याचे निश्चित करण्यात आले.
पुणे येथे कुकडी संयुक्त प्रकल्प व घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कुकडी अधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीत जुलै 2024पर्यंत धरणाचे पाणी प्राधान्याने पिण्यासाठी राखून ठेवण्याबाबत चर्चा झाली. उर्वरित पाणी रब्बी पिकांना देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. पाणीटंचाईच्या काळात टॅंकरसाठी जलस्रोतांचे नियोजन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
“घोड’चे आवर्तन सोडण्याबाबत लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्याप्रमाणे निर्णय घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी केल्या. हवामान विभागाने दोन चक्रीवादळे तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यामुळे पाऊस पडू शकतो असे सांगितले आहे.
त्यानुसार पुढील काळात किती पाऊस पडतो हे पाहून सिंचन व पिण्यासाठी पाणी सोडण्याच्या तारखांमध्ये लवचिकता ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.सहकारमंत्री दिलीप वळसे, आ. बबन पाचपुते, आ. रोहित पवार, आ. संजय शिंदे, अण्णासाहेब शेलार, “कुकडी’चे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, कार्यकारी अभियंता किरण देशमुख आदी उपस्थित होते. सीना धरण पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस असल्याने धरणातील पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे सीना कालव्याच्या योग्य नियोजन करण्यासाठी कुकडी प्रकल्पातून भोसे खिंड येथून पाणी सोडण्यात यावे. सीना कालव्याचे रब्बी व उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तन सोडावे, अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी केली.
“विसापूर’मध्ये पाणी सोडावे : शेलार
विसापूर धरणाचा कुकडी प्रकल्पात समावेश आहे. “विसापूर’च्या रब्बीच्या आवर्तनासाठी कुकडी प्रकल्पातून 300 एमसीएफटी पाणी सोडण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.