विजय घोरपडे
नागठाणे – सातारा तालुक्यातील बोरगाव येथे स्वातंत्र्यपूर्व काळात 1946 साली स्थापना झालेले सातारा जिल्ह्यातील पहिले कृषी विद्यालय अर्थात बोरगावची शेती शाळा ही राहुरीच्या कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेली. बोरगाव परिसरातील सामान्यांची शेतीशाळा या नावानेच ओळख असलेल्या विद्यालयास सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता, सोयीसुविधांचा अभाव आणि विद्यार्थीच नसल्याने अवकळा आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, 350 एकर एवढे विस्तीर्ण शेती क्षेत्र असणाऱ्या बोरगाव कृषी विद्यालय म्हणजे शिक्षणाची पंढरी म्हटली जात होती. राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या या विद्यालयामधून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी दोन वर्षीय मराठी माध्यमाची कृषी पदविका प्राप्त करून आजपर्यंत हजारोंच्या संख्येने ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, खते, बि-बियाणे औषधे दुकानदार आदी क्षेत्रात मोठ्या संख्येने नोकरी,व्यवसाय करत आहेत. परंतु, आता या नोकऱ्या व व्यवसायाची पात्रता शासनाने बदलून कृषी पदवी आवश्यक केल्याने बोरगाव शेतीशाळेच्या या पदविका कोर्सकडे विद्यार्थानी अक्षरश: पाठ फिरवली आहे. द्वि-वर्षीय पदविका कोर्स अभ्यासक्रमात प्रथम वर्षासाठी 60 व द्वितीय वर्षासाठी 60 असे एकुण 120 विद्यार्थी ज्ञानार्जन करत असत. सध्या प्रथम वर्षात 18 व द्वितीय वर्षात 23 विद्यार्थी प्रवेशीत होऊन शिकत आहेत. तर विद्यार्थासाठीचे अवाढव्य वसतीगृह फक्त तीन विद्यार्थी सांभाळत आहेत.
एकेकाळी या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मोठी चढाओढ लागत होती. फळबागा, शेकडो गुरंढोरं, 60 कायमस्वरूपी कर्मचारी तर रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुध्दा मोठी होती. 350 एकरांपैकी 200 एकर प्रत्यक्ष वहिवाटची शेती तर 150 एकर जंगल या कृषी तंत्र विद्यालयाच्या अखत्यारीत असुन शेतमालाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत होते. येथे पिकणाऱ्या आवळा, चिक्कुला मोठी मागणी होती. या फळबागा आजही आहेत. मात्र घटलेली कर्मचारी संख्या व रोजंदारीवर मिळणाऱ्या मजूरांची कमतरतेमुळे शेतमालाचे फळबागांचे उत्पादन मात्र मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. या विद्यालयाची जमीन पाटेश्वराच्या डोंगर पायथ्याला असल्याने शेती व फळबागांसाठी लागणाऱ्या पाण्याचे दुर्भिक्षही वर्षानुवर्षे जाणवत आहे. यावर उपाय म्हणून 2009 साली उरमोडी नदीवरून लाखो रूपये खर्चून साडे तीन कि. मी. लांबीची पाणी योजना केली. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हे पाणी प्रत्यक्ष येथे अजुनही पोहोचलेले नाही. सध्या विद्यालयाच्या परिसरातील जेमतेम चार विहिरीतील पाण्यावर सध्या शेतीची तहान भागवली जात आहे.
कृषी तंत्र विद्यालयाचे सध्याचे अधिक्षक तथा प्राचार्य या नदीवरून आणलेल्या योजनेतील त्रुटी दुर करुन योजना चालू करण्यासाठी स्थानिकांच्या संपर्कात असलेचे समजते. विद्यालयात पुर्वी कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. स्थानिक लोकांना रोजगार मिळत होता त्यामुळे ड्रायव्हर, जनावरांना संभाळणारे, शेती अवजारे चालवण्यासाठी मनुष्यबळ आणि यामधून होणारे फळे, ज्वारी, कडधान्य आदीचे उत्पादन मोठे होते. सध्या मात्र या कृषी पंढरीला उतरती कळा लागल्याचे चित्र दिसत आहे. शासनाने कर्मचारी भरती बंदच केल्याने विद्यालयातील 36 कर्मचारी सेवानिवृत्त झाले. उरलेल्या जेमतेम चोवीस कर्मचाऱ्यांवर विद्यालयाच्या शेतीचा कारभार सुरु आहे.
आता बोरगावच्या याच विद्यालयात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र चालू करण्यात आले असून साधारण या विज्ञान केंद्रास 125 एकर जमीन वर्ग करण्यात आल्याने तो विभाग पूर्ण क्षमतेने चालू असल्याचे दिसून येत आहे. एकुणच मनुष्यबळाअभावी फक्त पंधरा ते वीस एकर शेती वहिवाटीत राहून उर्वरित संपूर्ण क्षेत्र पडीक असल्याचे चित्र पहायला मिळत आहे जनावरांच्या संख्येत मोठी घट झाली असून विद्यार्थाच्या अभ्यासासाठी पुर्वीच्या खिलार गाय, बैल, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली असून यामध्ये पाच दहा जनावरे थोड्या शेळ्या मेंढ्या वगळता जनावराचे गोठे मोकळे झालेले आहेत.
मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आहेत पण चालक नसल्यामुळे तेही बंद आहेत. विद्यालयाला मिळणारे अनुदान वेळेवर मिळायला हवेच पण सर्व सोयी सुविधांची सुधारणा करून बंद पडत आलेल्या डिप्लोमा कोर्सच्या ऐवजी डिग्री कोर्स चालू केल्यास सातारा, सांगली जिल्हयातील विद्यार्थाना बी. एस्स. सी. पदवी, एम. एस्स. सी. च्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राहूरी, दापोली, रावी अशा ठिकाणी न जाता येथेच शिक्षणाची संधी मिळेल. पण यासाठी शासनाच्या संबंधीत विभागाने काही दुरगामी निर्णय घेऊन मानसिकता बदलली पाहीजे. व लोकप्रतिनिधींची ही इच्छाशक्ती असणं गरजेचं असल्याची चर्चा स्थानिकांच्यात होत आहे. परंतू जे काही निर्णय घ्यायचेत ते शासन व लोकप्रतिनिधीं घेणार का ? व या स्वातंत्र्यपूर्व शेती शाळेस गतवैभव मिळेल का ? हाच प्रश्न बोरगावच्या व जिल्हयातील जनतेच्या मनात आहे.