अमरावती – समृद्धी महामार्ग चांगलाच आहे. पण यासाठी जमीनी कोणाची घेतली. शेतकऱ्याचीच ना सध्या देशात विकासाचे प्रकल्प सुरु आहेत. या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची जमीन घेतली जात आहे. यामुळे जमीन कमी होत चालली आहे. शेतीवर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. याद्वारे एक प्रकारे मोदी सरकारच्या विकासकामांवर प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.
शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. तेथे ते म्हणाले, विकासकामांसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे. एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची जमीन घेतली जात आहे. याचा परिणाम उत्पन्नावर होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. शेतीचा धंदा अडचणीचा होत चालला आहे. जमीन कमी होत चालली आहे.
आत्महत्या हा विषय काही नवीन नाही. मी शेतमंत्री असताना नागपूर, वर्धा येथे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा अहवाल आला होता. हा अहवाल बघून अस्वस्थ झालो. थेट तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाऊन भेटलो. आम्ही लगेचच देशभरातील कर्जबाजारी शेतकऱ्यांची यादी मागवली. त्यावेळी 78 हजार कोटींचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
शरद पवार म्हणाले, सन 2004 ला मी शेतीमंत्री झालो. त्यावेळी देशाच्या गोदामात एक महिना पुरेल एवढंच धान्य शिल्लक होतं. त्यामुळे धान्य आयात करावं लागणार होतं. मी त्या निर्णयावर सही करत नव्हतो. मला पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोन आला. धान्य आयात केलं नाही तर उपासमारीने लोकं मरतील, असं मनमोहन सिंग यांनी मला सांगितलं. मी सही केली.
पण डोक्यात ठरवलं की यापुढे देशावर आयात करण्याची वेळ येणार नाही. 2014 साली तांदुळ निर्यातीत भारत अग्रक्रमांकावर आला. गहु आणि साखरेची निर्यात सुरु झाली. हे सर्व शक्य झालं ते कष्टकरी शेतकऱ्यामुळे, असं शरद पवार यांनी सांगितलं. महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेल्या मुद्द्यांचीही आठवण शरद पवार यांनी करुन दिली.