दिवे -लॉकडाऊनमुळे शेतीचक्र थंडावले असताना पुरंदर तालुक्यातील जिगरबाज शेतकरी त्यावर मात करीत आहेत. काबाडकष्ट करून पिकविलेला शेतीमाल ग्राहकांच्या दारात जाऊन विकत आहेत. दिवे परिसरात भाजीपाला विक्रीसाठी “शेतकरी आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात अवतरली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यास ग्राहकांकडूनही प्रतिसाद मिळत आहे.
सध्या करोनामुळे संपूर्ण जग घरात बंदिस्त झाले आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मात्र, शिवारात घाम गाळत आहे. शेतीमधून उत्पन्न आले नाही तर कुटुंबाचा गाडा चालणार नाही, याची जाणीव शेतकऱ्यांना आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात शेतकरी जखडला होता. मात्र, राज्य शासनाने यात शेतकऱ्यांना पूरक घटकांसाठी थोडी सूट दिली होती. त्यामुळे गावगाड्यातील अर्थकारण त्यावेळी शेतकऱ्यांसाठी सोयीचे ठरले होते.
लॉकडाऊनमधून मार्ग काढत शेतकऱ्यांनी थोड्या जमिनीत पिकविलेला माल ग्राहकांच्या दारात पोहचविला आहे. ताजा, स्वच्छ शेतीमाल ग्राहकांना उंबरठ्यातच मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांची विक्रीची यंत्रणा जोमाने काम करू लागली. पुरंदर तालुक्यातील अनेक मोठ्या गावांमध्ये बागायतदार शेतकरी भाजीपाला विक्री करीत आहे. यात कुटुंबातील महिला विक्री करीत आहेत.
महिला शेतकरी शेतीमाल दुपारी तोडणी करून संध्याकाळी तो गावातच घरोघरी फिरुन विकत आहेत. ग्रामीण भागात शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी मजबूत होत आहे. वीस किलो भेंडी एका तासात गावातच विकल्याचे दुर्गाताई ढुमे यांनी सांगितले. आम्हाला ताजा व स्वच्छ भाजीपाला मिळाल्याचा आनंद होतो, असे मुंबईवरून आपल्या मूळगावी आलेल्या गीताताई कुंभार यांनी सांगितले.