नवी दिल्ली: पूर्व लडाखच्या सीमा भागात निर्माण झालेली कोंडी चर्चेद्वारे सामंजस्याने सोडवण्याला आज भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान सहमती दिली गेली. द्विपक्षीय करारांनुसार दोन्ही देशांदरम्यानचा तणाव कमी केला जाईल. सीमा भागात शांतता आणि सौहार्दाचे वातावरण कायम राखून द्विपक्षीय संबंध विकसित करण्यावर भर दिला जावा, असे या चर्चेदरम्यान ठरले असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
लडाखच्या डोंगराळ भागात गेल्या महिन्याभरापासून असलेल्या तणावाच्या पार्श्वभुमीवर शनिवारी दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. चीनच्या बाजूकडील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील मालदो येथील “बॉर्डर पर्सोनेल मिटींग पॉईंट’इथे ही चर्चा झाली.
दोन्ही देशांमध्ये मुत्सदेगिरीचे संबंध प्रस्थापित होण्यास यंदा 70 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे कोंडीवर लवकरात लवकर तोडगा निघण्यामुळे द्विपक्षीय संबंधांमध्ये वाढच होईल, असेही चर्चेत ठरले. त्यानुसार सीमा भागात शांतता आणि सौहार्दता कायम राखण्यासाठी लष्करी आणि अधिकारी पातळीवरील चर्चेची प्रक्रिया यापुढेही सुरूच ठेवली जाईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
भारत आणि चीनचे अधिकारी, भारत-चीन सरहद्द क्षेत्रातील सद्यस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सध्या असलेल्या लष्करी आणि राजनैतिक माध्यमातून निरंतर प्रयत्न करत आहेत. या टप्प्यावर, या प्रयत्नांबद्दल अटकळींवर आधारित कुठलेही निराधार वार्तांकन उपयुक्त ठरणार नाही. त्यामुळे अशा प्रकारचे वार्तांकन टाळण्याचा सल्ला माध्यमांना देण्यात आल्याचे सैन्य दलाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.