पिंपरी – गंगानगर आकुर्डी येथील रियल फ्रेग्रन्स (पुणे) प्रा ली या अगरबत्ती बनविणाऱ्या कंपनीत मंगळवारी (दि. 6) सकाळी आग लागली. या आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली. कंपनी शेजारीच शाळा आहे. आग लागताच शाळेतील मुलांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. ही आग शेजारी असलेल्या चहा पॅकिंग कंपनीत पसरली. चहा पॅकिंग कंपनीचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
सोमवारी सकाळी अगरबत्ती बनविणाऱ्या रियल फ्रेग्रन्स (पुणे) प्रा. लि. या कंपनीतील कामगार कामावर आले. काम सुरू असताना अचानक एका विभागातून धुराचे लोट बाहेर पडू लागले. त्यावेळी कंपनीत सुमारे 50 महिला आणि 10 पुरुष कामगार काम करत होते. धूर येऊ लागताच सर्व कामगार तात्काळ बाहेर पडले. ही आग संपूर्ण कंपनीत पसरली. आगीचे मोठे लोट हवेत उडू लागले. कंपनीच्या शेजारीच विना इंग्लिश स्कूल ही शाळा आहे. आगीची माहिती मिळताच सर्व विद्यार्थ्यांना वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
अगरबत्तीच्या कारखान्यातील आग शेजारी असलेल्या चहा पॅकिंग कंपनीच्या गोडाऊन मध्ये पसरली. गोडाऊनमधील लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या परिसरात दोन बंब बसतील एवढीच जागा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना कसरत करावी लागली. सुमारे 60 जवानांनी आग विझविण्याचे काम केले.
बंबाला पाणी कमी पडत असल्याने खासगी टॅंकरने पाणी पुरविण्यात आले. दोन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळाले. त्यानंतर काही वेळ कुलिंगचे काम सुरु होते. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. आग मोठी असल्याने महापालिका, निगडी पोलीस, वाहतूक पोलीस, महावितरण यांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीकडे जाणारा वीजपुरवठा खंडित केला. आग सुरू असताना एक मोठा स्फोट झाला, त्यामुळे काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण होते. कंपनीतून पाच ते सहा सिलेंडर बाहेर काढण्यात आले. रियल फ्रेग्रन्स (पुणे) प्रा ली या कंपनीच्या जागी पूर्वी पेन्सिल तयार केली जात होती. मागील काही महिन्यांपासून तिथे अगरबत्तीचे उत्पादन सुरु करण्यात आले होते.
चहा पॅकिंग कंपनीचेही नुकसान
अगरबत्तीच्या कंपनीतील आग काही वेळेतच शेजारी असलेल्या चहा पॅकींग करणाऱ्या कंपनीत पसरली. या कंपनीत मागील काही दिवसांत पॅकींग मटेरीयल आले होते. त्याच गोडाऊन मध्ये आग पसरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. गोडाऊनचे पत्रे फाडून ही आग विझविण्यात आली.