पुणे – मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे, यासाठी पुणे बार असोसिएशनच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हा न्यायालयाबाहेर करण्यात आलेल्या या आंदोलनात असोशिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि वकील सहभागी झाले होते. स्वतंत्र खंडपीठाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून तो मार्गी लागावा, यासाठी पुणे बार असोशिएशनच्या वतीने निर्धारपूर्वक लढा सुरू आहे.
पुणे बार असोशिएनचे अध्यक्ष ऍड. श्रीकांत अगस्ते, उपाध्यक्ष ऍड. रवी लाढाणे, ऍड. सुभाष पवार, ऍड. बिपिन पाटोळे, ऍड. दत्ता भाडळे, ऍड. मंगेश लेंडघर, ऍड. नितीन झंझाड, ऍड. भाग्यश्री मुळे, ऍड. ओंकार चव्हाण व इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, असा 1978 रोजी राज्याच्या विधानसभेत ठराव संमत होऊनदेखील, अद्याप त्याची कार्यवाही झालेली नाही. मागील 42 वर्षांपासून असोशिएशनच्या सदस्यांनी पाठपुरावा करुन, लेखी निवेदने लोकप्रतिनिधींना देण्यात आले.
मात्र, त्यावर अद्याप कुठलेही कार्यवाही झालेली नाही. पुणे शहर आता स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत आहे. याबरोबरच शहरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तसेच सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा, यासाठी पुण्यात तातडीने खंडपीठ उभारले जाणे गरजेचे आहे. असे मत अध्यक्ष ऍड. श्रीकांत अगस्ते यांनी याप्रसंगी व्यक्त केले.