नवी दिल्ली : भारताची ऐतिहासिक चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता भारत आणखी एक मोठा पल्ला गाठण्याच्या तयारीला लागला आहे. अंतराळानंतर आता भारत महासागरात आपल्या मोहिमेची तयारी करत असल्याची माहिती समोर येत आहे. ‘समुद्रयान’ प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या साहाय्याने मानवाला समुद्राच्या आत 6000 मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी या मोहिमेविषयी माहिती दिली आहे.
किरण रिजिजू यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. या मोहिमेला ‘समुद्रयान मिशन’ असे नाव देण्यात आले आहे. ज्या सबमर्सिबलमध्ये लोकांना समुद्रात खोलवर नेले जाईल त्याच्या तपासणीचे काम 2024 मध्ये पूर्ण होणार आहे. भविष्यात भारत 2047 साली म्हणजेच स्वातंत्र्याच्या 100 वर्षांच्या आत एक विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताने समुद्राच्या तळाशी खोलवर जाण्याची मोहीम सुरू केली आहे. भारत सरकार एक सबमर्सिबल बनवत आहे, ज्याला ‘मत्स्य 6000’ असे नाव देण्यात आले आहे. समुद्रात 6000 मीटर खोलवर शोध घेण्याच्या उद्देशाने हे सबमर्सिबल तयार केले जात आहे. ही सबमर्सिबल 3 लोकांना समुद्रात 6000 मीटर खोलीपर्यंत नेण्यास सक्षम असणार आहे,
Next is “Samudrayaan”
This is ‘MATSYA 6000’ submersible under construction at National Institute of Ocean Technology at Chennai. India’s first manned Deep Ocean Mission ‘Samudrayaan’ plans to send 3 humans in 6-km ocean depth in a submersible, to study the deep sea resources and… pic.twitter.com/aHuR56esi7— Kiren Rijiju (@KirenRijiju) September 11, 2023
रिजीजूंनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी भारताने 7000 मीटर खोलीपर्यंत मानवरहित पाणबुडी पाठवण्याचे मिशन पूर्ण केले आहे. आता मानवयुक्त मोहीम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. ही पाणबुडी टप्प्याटप्प्यानी तयार केली जात आहे. पहिल्यांदाच 500 मीटर खोलीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली ही पाणबुडी तयार करण्यात आली. यानंतर, भारताने मानवरहित रोबोटिक पाणबुडी समुद्राखाली 6000-7000 मीटर खोलीपर्यंत उतरवली. आता समुद्राची खोली मोजण्याचे काम मानवयुक्त सबमर्सिबलकडे सोपविण्याची तयारी सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही पाणबुडी टायटॅनियम मिश्र धातुपासून बनवली जात आहे. ज्यामध्ये 3 लोक बसू शकतील. सेन्सर बसवलेली ही अत्याधुनिक पाणबुडी असेल जी समुद्राच्या तळातून उठणाऱ्या भूकंपाच्या लाटा शोधण्यात सक्षम असेल. याचा संपूर्ण प्रवास 12 कॅमेऱ्यांच्या मदतीने रेकॉर्ड केला जाणार आहे. ‘मत्स्या 6000’ या सबमर्सिबलची पूर्ण तयारी आणि चाचणी करण्याचे काम 2024 पर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. 2026 मध्ये ते समुद्राच्या खोलवर उतरवले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या मोहिमेच्या यशामुळे सागरी संपत्तीची पाहणी करण्याची संधी तर मिळणार आहेच, शिवाय सागरी पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. 6 हजार किमी खोलीपर्यंत मानवयुक्त सबमर्सिबलसह समुद्राखाली जाणे म्हणजे कोबाल्ट, दुर्मिळ पृथ्वीचे घटक, मॅंगनीज इत्यादी समुद्रातून बाहेर पडणारी खनिजे मानव स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकणार आहे. त्यांचे वेगळे नमुने गोळा केल्यानंतर ते विश्लेषणासाठी देखील वापरले जाऊ शकतात. सबमर्सिबल ‘मत्स्या 6000’ ची सामान्य ऑपरेटिंग क्षमता 12 तासांची असेल, परंतु आपत्कालीन परिस्थितीत त्याची कार्य क्षमता 96 तासांपर्यंत वाढवता येईल. या मोहिमेचा इको-सिस्टमवर कोणताही दुष्परिणाम होणार नाही कारण त्याचा एकमेव उद्देश आहे. असे रिजीजू यांनी म्हटले आहे.