पिंपरी – उद्योगनगरीला 2009-10 साली जागतिक आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये सहा महिने उद्योगधंदे बंद राहिल्याने पुन्हा तशी परिस्थिती उद्भवते की काय? अशी अनेकांच्या मनात शंका होती. मंदीच्या खूपच चर्चा उद्योग जगतात होत्या. अनेक अडचणींचा उद्योगनगरी सामना करत असली तरी मंदीचे सावट नसल्याचे उद्योजक सांगत आहेत.
आर्थिक कोंडी फोडून पिंपरी-चिंचवड एमआयडीसीचा आर्थिक कणा असलेल्या वाहन निर्मिती क्षेत्राने मंदीचा अंदाज फोल ठरविला आहे. याच बळावर उद्योगनगरी कामगारविश्वाला मोठा दिलासा देणारी ठरली आहे.
याबाबत दैनिक “प्रभात’ ने उद्योजक आणि कामगार नेत्यांचे मत जाणून घेतले असता सर्वांना अडचणी आहेत; परंतु मंदीचे सावट नसल्याचे स्पष्ट केले आहे. पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ऍड. आप्पासाहेब शिंदे यांनी दैनिक प्रभातशी बोलताना सांगितले की, टाळेबंदीच्या काळात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांवर मोठे संकट ओढावले होते. अजूनही उद्योग आर्थिक व इतर अडचणींचा सामना करत आहेत; परंतु स्थिती पूर्वपदावर येण्यास काही अवधी लागणार आहे. मंदीचे सावट येण्याची काहीही चिन्हे नाहीत. केवळ राज्य व केंद्र सरकारने येत्या अर्थसंकल्पात उद्योगांसाठी ठोस उपाययोजना करण्यांची गरज आहे.
सीटूचे अजित अभ्यंकर यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मार्च महिन्याअखेरीस लॉकडाऊन झाल्यानंतर त्याचा परिणाम यंदाच्या आर्थिक वर्षावर दिसून आला. केंद्रीय कामगार संघटनांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही संपत असलेल्या वेतनवाढ कराराबाबत व्यवस्थापनाला मागणी पत्र सादर केले आहे. मात्र, लॉकडाऊननंतर अनुभवलेल्या बाबींनंतर या विषयावर कामगार संघटनादेखील फारशा आक्रमक नाहीत.
वेतनवाढ करार लांबणीवर पडल्यानंतरही दरम्यानच्या कालावधीतील फरकाची रक्कम कामगारांना मिळणार की नाही, याबाबत आम्ही साशंक आहोत, असेही ते म्हणाले.
राष्ट्रीय श्रमिक एकता महासंघाचे अध्यक्ष किशोर ढोकले यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये कंपन्यांचे उत्पादन प्रकल्प बंद असताना कामगारांना घरी बसावे लागले. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने पुढील आर्थिक वर्षातील रजा कपात केल्याने पुढील वर्षातील किमान 28 तर कमाल 48 हक्कांच्या रजांना कामगार मुकला आहे. त्यामुळे पुढील आर्थिक वर्षात कामगारांना पगारी सुट्टया घ्याव्या लागणार आहेत. परिणामी त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
लॉकडाऊनमुळे उद्योनगरीला आर्थिक मंदीचा धोका निर्माण झाला होता. मात्र वाहन निर्मिती क्षेत्राचा आधार मिळाल्याने उद्योगनगरी पुन्हा एकदा नव्या दमाने उभी राहिली असून, 2009-10 मध्ये आलेल्या आर्थिक मंदीचा उद्योगनगरीने यशस्वीपणे सामना केल्याची आठवण सर्वांनी आवर्जून सांगितली. वाहन निर्मिती क्षेत्राशिवाय अन्य उत्पादन असलेल्या काही कंपन्यांच्या वर्क ऑडर घटल्याने कंत्राटी कामगारांना कामावरुन कमी करण्यात आले आहे, अशी माहिती दिली.