नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनिटला आग लागून दहा बालकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेवर सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यात सरकारकडून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून मृत बालकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत सुमारे १० बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आणि मनाला व्यथित करणारी आहे.
या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी!— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 9, 2021
या दुदैवी घटनेवर बोलताना, प्रगतीशील महाराष्ट्रात दहा नवजात बालकांचा मृत्यू आयसीयूमध्ये व्हावा यासारखी लाजिरवाणी परिस्थिती दुसरी नाही. मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखाची मदत द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासातील ही काळी घटना आहे. फायर ऑडिट का झाले नाही? याची चौकशी व्हावी. यावर राजकारण करायचं नाही मात्र ज्यापद्धतीने दावे केले जात आहेत. त्यात अर्थ नसून ते चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यातील सात बालकांना वातवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.