पिंपरी-पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना लागू असलेला शास्तीकर रद्द करण्याची घोषणा आम्ही सभागृहात केली आहे. ही पवित्र घोषणा असून, त्याची अंमलबजावणी न केल्यास सरकारवर हक्कभंग दाखल होऊ शकतो, असे सांगत अनेक जणांनकडून शासकीय अध्यादेश निघाला नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या पोटनिवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तत्काळ अध्यादेश काढणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि. 23) सांगवीतील पीडब्ल्यूडी मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, केंद्रीय मंत्री रामदास आठवले,
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडीक, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार राम सातपुते, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला. ते म्हणाले, नवी मुंबईच्या धर्तीवर चिंचवडला सुनियोजित आंतरराष्ट्रीय शहर बनविण्याचा आमदार लक्षमण जगताप यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यांच्या अकाली निधनाने जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवार उभा करायला नको होता. मात्र, आता अश्विनी जगताप यांच्याविरोधात उमेदवार दिल्याने राष्ट्रवादीला आम्ही लक्षमणभाऊंची ताकद या निवडणुकीत दाखवून देऊ. या पोटनिवडणुकीत आम्ही अभुतपूर्व विजय मिळवून दाखवू. तसेच चिंचवडमधील अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्याची आम्ही गॅरंटी घेत असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले. यावेळी रामदास आठवले म्हणाले, शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. या पोटनिवडणुकीत उमेदवार देऊ नका, असे मी शरद पवार आणि अजितदादांना सांगितले पाहिजे होते; मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आम्ही सर्व घटकपक्ष अश्विनी जगताप यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे सांगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कोणी बदलू शकत नाहीत. नरेंद्र मोदी हे संविधान मजबूत करण्याचे काम करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, धनंजय महाडिक, उमेदवार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे यांनी मनोगत व्यक्त केले.
भाजपमध्ये इनकमिंग सुरुच
या प्रचार सभेत कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षात घुसमट होत असल्याबद्दल साठे यांनी कालच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपला बळकटी मिळाली आहे.