देशाची 1947 मध्ये फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानात सगळी संपत्ती, घरदार सोडून आलेल्या काही कुटुंबांनी पंजाबमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. जिद्द, परिश्रम करण्याची तयारी, चिकाटी या गुणांच्या आधारे आज यापैकी अनेक कुटुंबियांनी क्रीडा साहित्याच्या उद्योगात नाव कमावले आहे. जालंधरमध्ये 127 प्रकारच्या वेगवेगळ्या क्रीडा साहित्यांचे उत्पादन करणाऱ्या या कुटुंबांनी गुणवत्तेच्या जोरावर चीन, तैवान तसेच युरोपतील उत्पादक कंपन्यांना मागे टाकले आहे.
फाळणीनंतर जालंधरमध्ये स्थायिक झालेले खेळ व्यावसायिक आणि उद्योगपती पाकिस्तानातून येताना सगळ्यावर पाणी सोडून रिकाम्या हाताने आले होते. कुणाकडेच राहायला घर नव्हते आणि दोन वेळेला काय खायचे हा मोठा प्रश्न होता. त्यावेळी सरकारने त्यांना राहण्यासाठी जागा दिली आणि काही आर्थिक मदत केली. आलेल्या स्थलांतरितांपैकी काहींनी जालंधरमध्येच राहणे पसंत केले तर काही कुटुंबे मेरठला गेली. जालंधरमध्ये राहिलेल्या कुटुंबांनी क्रीडा साहित्य उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला.
स्पार्टन स्पोर्टस –
पाकिस्तानातून आलेल्या वेद प्रकाश यांनी क्रीडा साहित्याच्या उत्पादनाचा पाया घातला. आज त्यांची तिसरी पिढी नेटाने हा उद्योग पुढे चालवत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, ख्रिस गेलसारख्या तडाखेबंद फलंदाजांनी वेद प्रकाश यांच्या स्पार्टन स्पोर्टसच्या बॅटने खेळून अनेक विक्रम नोंदवले आहेत.
कंपनीचे संचालक कुणाल शर्मा सांगतात की, वेद प्रकाश पाकिस्तानातही फुटबॉलचे, व्हॉलीबॉल, तसेच विविध खेळांसाठी लागणाऱ्या चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या चेंडुंचे उत्पादन करत असत. जालंधरमध्ये रिकाम्या हाताने यावे लागल्यानंतर त्यांनी पुन्हा इथे नव्याने व्यवसायाची पायाभरणी केली. कुणाल यांचे वडील ज्योती प्रकाश आणि आजोबा वेद प्रकाश हे पाकिस्तानातून जालंधरला आले होते तेव्हा त्यांच्याकडे जेमतेम 600 रुपये होते. त्याच पैशातून व्यवसाय सुरू केला.
पहिली दोन वर्षे अतिशय संघर्षाची होती. राहायला एके ठिकाणी जागा नव्हती. भांडी आणि गरजेच्या वस्तू नव्हत्या. त्यांनी स्वतः फुटबॉल शिवायला सुरवात केली आणि स्थानिक कारागिरांनी बरोबर घेऊन त्यांनाही याचे प्रशिक्षण देऊन तयार केले. नंतर त्यांचा वारसा त्यांचे चिरंजीव ज्योति प्रकाश चालवू लागले. त्यांनी उत्पादीत केलेल्या क्रिकेटच्या बॅटस् नामवंत क्रिकेटपटू वापरू लागले. त्यांनी बाजारातील मागणीनुसार आणखी काही उत्पादने तयार करणे सुरू केले. त्याचबरोबर त्यांच्या कारखान्यात क्रिकेटसाठी लागणारे स्टंप, पॅडस्, ग्लोव्हज्, हेल्मेट व इतर अक्सेसरीजचे उत्पादन सुरू झाले. तिसऱ्या पिढीच्या रुपात कुणाल यांनी फायटर ब्रँडने क्रीडा साहित्याचे उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबर खेळताना लागणाऱ्या कपड्यांचे उत्पादनही सुरू केले आहे.
चीन आणि तैवानशी स्पर्धा
फाळणीनंतर पाकिस्तानातून दिल्ली आणि नंतर जालंधरमध्ये येऊन स्थायिक झालेल्या इक्बालनाथ शर्मा यांच्या तिसऱ्या पिढीने आता क्रीडा साहित्याच्या क्षेत्रात चीन आणि तैवानशी स्पर्धा सुरू केली आहे. त्यांच्याकडे क्रीडा साहित्य तयार करण्याचे कौशल्य होते. जालंधरला येताच त्यांनी फुटबॉल आणि व्हॉलीबॉलचे उत्पादन सुरू केले. ते स्वतःच उत्पादन करायचे आणि विकायला घेऊन जायचे. नंतर त्यांच्या मुलाने सुभाष शर्मा यांनी एफसीआयमधील नोकरी सोडून व्यवसायात मदत करण्यास सुरूवात केली. सुभाष यांनी फुटबॉल, व्हॉलीबॉलबरोबरच बॅडमिंटनच्या रॅकेटचे उत्पादन सुरू केले. त्याकाळात लाकडापासून रॅकेट बनवत आणि त्यांना खूप मागणी होती. त्यांनी फिलिप्स ब्रँडच्या नावाने रॅकेट विकणे सुरू केले.
1980 च्या दशकांत फिलिप्सच्या रॅकेटचा बाजारपेठेत मोठा दबदबा होता. रॅकेटबरोबरच शटल, नेट आणि बॅडमिंटनसाठीच्या शूजचे उत्पादन त्यांनी सुरु केले. आता तिसऱ्या पिढीच्या रुपाने सुमीत शर्मा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पहात आहेत. आता चामड्याऐवजी फुटबॉल, व्हॉलीबॉलसाठी सिंथेटिक लेदरचा वापर केला जातो. सुमीत यांनी फिटनेस उद्योगासाठी लागणारी उत्पादने तयार करण्यावर भर दिलेला आहे. क्रीडा साहित्याचे उत्पादन करणाऱ्या त्यांचे आता तीन कारखाने आहेत. फुल कार्बन ग्राफाईटच्या बॅडमिंटन रॅकेटचे उत्पादन ते करतात. या रॅकेट चीन आणि तैवानच्या तोडीस तोड आहेत.
हॉकी स्टिकची कमाल…
वेगवेगळ्या क्रीडा उत्पादनांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची स्थापना करणारे देशराज कोहली कुटुंबाची आज या क्षेत्रात वेगळी ओळख तयार झाली आहे. अखंड हिंदुस्थानात सियालकोट येथे त्यांनी हॉकी स्टिकचे उत्पादन सुरू केले. एवढेच नव्हे तर गुणवत्तेच्या जोरावर नाव कमावून व्हॅम्पायर नावाचा ब्रँडही विकसित केला. फाळणीनंतर ते भारतात आले. पुन्हा नव्याने व्हॅम्पायर नावानेच हॉकी स्टिकचे उत्पादन सुरू केले. नंतर त्यांच्या मुलाने रमेशचंद्र कोहली यांनी व्यवसाय वाढवला.
बॅडमिंटनच्या रॅकेट आणि क्रिकेटच्या बॅटचेही उत्पादन सुरू केले. 1965 च्या युद्धाच्यावेळी बंदुकांसाठी लागणाऱ्या लाकडी बटची टंचाई निर्माण झाली तेव्हा कोहली परिवाराने सगळी ताकद पणाला लावून बंदुकांसाठीच्या बट बनवून त्याचा पुरवठा केला होता. आता त्यांच्या तिसऱ्या पिढीच्या रुपाने सार्थक आणि मुलगी आकांक्षा या व्यवसायात उतरले आहेत. त्यांनी क्रीडा साहित्याचा रक्षक हा ब्रँड विकसित केला आहे.