नवी दिल्ली – संयुक्त जनता दल जेंव्हा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सहभागी होता तेंव्हा या पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरात जातीच्या आधारावर जनगणना केली जाण्याची मागणी जोरकसपणे मांडली होती. ऑक्टोबर २०२३ मध्ये जेंव्हा त्यांनी बिहार सरकारचा जात सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला होता त्यावेळी त्यांनी ही आपल्या सरकारची मोठी कामगिरी असल्याचा दावा केला होता. मात्र आता इंडियातून बाहेर पडल्यावर आणि पुन्हा भारतीय जनता पार्टीसोबत हातमिळवणी केल्यावर नितीश यांनी ही मागणी सोडून दिली आहे.
जातनिहाय जनगणनेला भाजपने थंड प्रतिसाद दिल्यामुळे नितीश आता या विषयावर गप्प असल्याचे मानले जाते आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवर अशी जनगणना केली जावी यासाठी नितीश महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश अशा विविध ठिकाणी सभाही घेणार होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसी येथेही यासंदर्भात त्यांची सभा आयोजित केली जाणार होती. मात्र आता ते सगळेच बॅक सीटवर गेले आहे. जनता दलाच्या एका नेत्याच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील आमचा प्रमुख सहकारी असलेला भारतीय जनता पार्टी हा पक्ष याबाबत कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यास तयार नसल्यामुळे आता जातनिहाय जनगणनेची मागणी आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी कोणताही कार्यक्रम अथवा सभा घेतली जाणार नाही.
एवढेच नाही तर भाजपची ज्या प्रादेशिक पक्षांसोबत आघाडी झाली आहे त्या पक्षांना त्यांच्या राज्याबाहेर अन्य राज्यांत निवडणूक लढवू देण्याचीही भाजपची तयारी नाही. अर्थात अशा पक्षांनी केवळ आपल्याच राज्यात राहावे अशी त्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही इतर राज्यांत निवडणूक लढवण्याची अपेक्षाही करू शकत नाही. पूर्वी आम्ही एनडीएत सहभागी होतो तेंव्हाही अन्य राज्यांत निवडणुका लढवल्या होत्या याकडे या नेत्याने लक्ष वेधले.