कराडच्या खराडे कॉलनीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
कराड – गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून अनेक नागरी सुविधांपासून वंचित असलेला भाग म्हणजे त्रिशंकू परिसर. या भागाचा कराड शहरामध्ये समावेश झाल्यानंतर नगरपालिकेच्या वतीने या परिसरात नागरी सुविधा देण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खराडे कॉलनी व मुजावर कॉलनीमधील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
दरम्यान या रस्त्याच्या कामामुळे या परिसरातील रहिवाशांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. यानिमित्ताने या रस्त्याचे भाग्य उघडले असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत होती. या रस्त्याच्या कामासाठी नगरसेविका सुप्रिया खराडे, सुनंदा शिंदे, मोहसिन आंबेकरी यांनीही पाठपुरावा केला होता.
रस्त्याच्या कामाच्या शुभारंभप्रसंगी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, गटनेते राजेंद्रसिंह यादव, हणमंतराव पवार, विजय वाटेगावकर, गजेंद्र कांबळे, किरण पाटील, स्मिता हुलवान, शारदा जाधव, आशा मुळे, फारूक पटवेकर, राहुल खराडे, निशांत ढेकळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
नगराध्यक्षा शिंदे म्हणाल्या, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या योजनेंतर्गत सुमारे चारशे मीटरचा हा रस्ता होत आहे. सुविधा नसल्याने येथील नागरिकांची बिकट अवस्था होती. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न मिटणार आहे, जयवंतराव पाटील म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून हा परिसर सर्व नागरी सुविधांपासून वंचित होता.
गेल्या तीन वर्षांमध्ये आम्ही येथील नागरिकांना सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. येथे पाणी व ड्रेनेजची सोय करण्यात आली आहे. रस्त्याचाही प्रश्न आता मिटणार आहे. नगरपालिकेच्या वतीने येत्या दोन महिन्यात हा रस्ता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यानंतर परिसरातील इतरही रस्त्यांची कामे तात्काळ केली जाणार आहेत.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, गेली अनेक वर्षे हा रस्ता प्रलंबित होता. यावर्षी रस्त्याच्या कामास मंजूरी मिळूनदेखील अतिवृष्टी तसेच दोन निवडणुकांच्या आचारसंहितामुळे रस्त्याचे काम लांबणीवर पडले होते. त्रिशंकू भाग अनेक दिवसांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. या भागाचा कराड शहरामध्ये समावेश झाल्यानंतर येथे सुविधा पोहोचविण्यासाठी अबकडपासून सुरूवात होत आहे. त्यामुळे येथे सुविधा पोहोचवण्यासाठी उशीर होत आहे. अजूनही या भागात अनेक सुविधा होणे गरजेचे आहे. येत्या दोन वर्षात त्या देण्याचा आमचा प्रयत्न राहील.