पिंपरी, (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी महायुतीचे तीनही पक्ष आग्रही असून आता शहर राष्ट्रवादी काॅंग्रेसनेही मावळ लोकसभा मतदारसंघातून भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील उर्फ अण्णा शेळके यांची दावेदारी सांगत असताना आता भाऊसाहेब यांनी देखील या दावेदारीत उडी घेतली आहे. दुसरीकडे भाजपचे पदाधिकारी देखील मावळमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
पर्यायाने महायुतीत वाढत्या इच्छुकांमुळे डोकेदुखी वाढणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहरच्या पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. या पत्रकार परिषदेत शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला अध्यक्ष कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, माजी नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसचे भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर उपस्िथत होते.
यावेळी पदाधिकाऱ्यांना सांगितले की, अजित पवार यांनी आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे, आणि त्यांची निर्णयक्षमता, विश्वासार्हता; यामुळेच शहराचा एवढा विकास झाला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघा मध्ये आण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचेच आमदार आहेत,
अशातच झालेल्या चिंचवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार नाना काटे यांना सुमारे १ लाख मते मिळालेली आहेत. एवढी संवेदनशील निवडणूक असून देखील सुमारे १ लाख मतांपर्यंत मजल मारली आहे. भाऊसाहेब भोईर हे तीस वर्षांपासून राजकारणात सकि्रय आहेत.
पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथील कामाचाही त्यांचा अनुभव असून सांस्कृतिक क्षेत्रामध्येही त्याचे योगदान मोठे आहे. नुकतेच त्यांनी १०० व्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली. भोईर यांचा मावळ भागात चांगला जनसंपर्क व नातीगोती असून उरण, कर्जत व पनवेल मतदार संघांमध्ये देखील त्यांचा पूर्वीपासून संपर्क आहे. यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
शहर भाजपही करतेय दावा
गेल्या तीनही लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनाचा उमेदवार विजयी होत असतानाही शहर भाजपकडून सातत्याने मावळवर दावा सांगितला जात आहे. अलिकडेच झालेल्या पक्ष कार्यक्रमात शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाने लढावे, ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
त्यासाठी आपल्याला बूथ स्तरावर ५१ टक्के मतदानासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. अस असेल तरच केंद्र आणि प्रदेश स्तरावर मावळासाठी आपला कमळाचा विचार होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ५१ टक्कयांची लढाई लढायची आहे. या कार्यासाठी पक्षासाठी आपण उभे राहिले तर पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे.
महायुतीला बसेल का फटका
पक्षश्रेष्ठींकडून कोणताही निर्णय होत नसल्याने आणि आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या जात नसल्याने महायुतीत सातत्याने इच्छुकांची संख्याही वाढत आहे. एनवेळी इच्छुकांच्या इच्छांचे रुपांतर नाराजीत झाल्यास एन प्रचाराच्या काळात तीनही पक्षांना मनोमिलनाची कवायत करावी लागू शकते. याचा मोठा फटका महायुतीला बसू शकतो.