काबुल : अफगानिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगानिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे. यातच तालिबान्यांविरोधात जगभरातून विरोध दर्शविण्यात येत आहे. अनेकांकडून अफगाणी लोकांप्रती चिंता व्यक्त केली जात आहे. जगाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा उल्लेख “महाशक्तींचे/साम्राज्यांचे कब्रस्तान’ असा केला जातो.
अफगाणिस्थानात लोकशाही पूर्णपणे संपुष्ठात आणत तालिबान्यांनी आपला हक्क दाखवला आहे. त्यातच तालिबान्यांच्या क्रूरतेला घाबरून इथल्या नागरिकांनी देश सोडणे पसंत केले आहे. याविषयीची आकडेवारी आता संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेने मांडली आहे.
अफगाणिस्तान देशातील लोकसंख्येपैकी १.४ कोटी जणांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती या संघटनेने व्यक्त केली आहे.
या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार,’ गेल्या दोन वर्षात कोरोनाची साथ आणि तेथील वातावरणामुळे झालेली पर्यावरणहानी झाली आहे. यामुळे ४० टक्के पिके नष्ट झाली आहेत. दुष्काळामुळे असंख्य गुरेढोरे मरण पावली. हजारो लोक विस्थापित झाले. येत्या काळात नागरिकांना अन्नधान्याचा पुरेसा साठा पोहोचविण्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २० कोटी डॉलर इतका खर्च होणार आहे.