मुंबई – बनावट प्रमाण पत्रे, बोगस कारवाया, खंडणीखोरी या साऱ्या प्रकरणात अडकलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत.
एका खंडणीखोर अधिकाऱ्याची पाठराखण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे त्यांची ही अवस्था आता बघवत नाही अशा शब्दात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एनसीबीचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात सज्जड पुरावे सातत्याने सादर करून नवाब मलिक यांनी त्यांच्यावर निशाणा साधल्यानंतर काल देवेंद्र फडणवीस यांनी वानखेडेंची पाठराखण केली होती.
एखादा अधिकारी तपास करतो म्हटल्यावर त्याचा जात धर्म काढून त्याच्यावर आरोप करणे चुकीचे आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावर राऊत यांनी वरील प्रतिक्रीया दिली आहे. एका दूरचित्रवाणीवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की ज्या अधिकाऱ्याची फडणवीस वकिली करीत आहेत त्याने अनेक गैरप्रकार केले आहेत.
रिया चक्रवर्तीलाही असेच अडकवण्यात आले होते. तिच्यावर अजूनही आरोपपत्र दाखल झालेले नाही. ही सरळसरळ खंडणीखोरी असून अशा खंडणीखोराची फडणवीस वकिली का करीत आहेत असा सवालही राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी केंद्र सरकारनेच हे कारस्थान रचले आहे या आरोपाचाही त्यांनी पुनरूच्चार केला आहे.