समीरण बा. नागवडे
श्रीगोंदा -तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांच्या उचलबांगडीनंतर काहीसा सावध पवित्रा घेतलेल्या वाळूतस्करांनी पुन्हा एकदा बिनदिक्कतपणे वाळूउपसा सुरू केला आहे. वाळूतस्करांना अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांचा “आशीर्वाद’ असल्याने त्यांना कोणाचा भय उरलेले नाही.
तालुक्यासाठी वाळूतस्करी नवीन नाही. वर्षानुवर्षे श्रीगोंद्यात खुलेआम वाळूउपसा सुरू आहे. तालुक्यातील घोड, भीमा, सीना, हंगा नद्यांसह गावागावात ओढ्या-नाल्यांतून खुलेआम शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा सुरू आहे. तालुक्यातील राजापूर, माठ, दाणेवाडी, गव्हाणेवाडी, बेलवंडी बुद्रुक, सांगवी दुमाला, गार, कौठा, आर्वी-अनगरे, पेडगाव, अजनुज, निमगाव खलू, काष्टी, वांगदरी, आढळगाव, टाकळी, हिरडगाव, चवर सांगवी आदी गावांत दिवसाढवळ्या वाळूचा अवैधरित्या उपसा सुरू आहे. नद्या, ओढ्या-नाल्यांतील वाळूसाठे कमी होत चालल्याने तस्कर वनविभागाच्या हद्दीतुन देखील वाळू उपसा करीत आहेत.
तालुक्यातील वाळूतस्करीला महसूल व पोलीस प्रशासनासह नेतेमंडळींचा “आशीर्वाद’ असल्याची गोष्ट लपून राहिलेली नाही. त्याच्याही पुढे जात काही ठिकाणी वाळूतस्कर, अधिकारी आणि पदाधिकारी एकत्र येत “भागीदारी’त वाळूउपसा करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील वाळूतस्करी रोखण्यासाठी महसूल व पोलीस प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात नाहीत.
तालुक्यात अपवाद वगळता प्रमुख नेतेमंडळीसह त्यांचे समर्थकच वाळूतस्करीत असल्याने एरव्ही राजकीय विषयांवर अतिसंवेदनशीलता दाखविणारे नेते वाळूतस्करी सारख्या गंभीर विषयाकडे मात्र सोयीस्करपणे कानाडोळा करतात. ज्या नेतेमंडळींनी वाळूतस्करीविषयी आवाज उठवला त्यामागे देखील (अर्थ) कारण असल्याचे बोलले जाते. तालुक्यात दररोज हजारो ब्रास वाळूचा खुलेआम उपसा होत असताना अधिकारी व पदाधिकारी गप्प असल्याने वाळूतस्करांनी तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या बोटचेपी भूमिकेमुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.
मागील आठवड्यात तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांची उचलबांगडी झाल्याने आता नवा अधिकारी कोण आणायचा इथपासूनचे नियोजन वाळूतस्कर करीत असल्याने नव्याने येणाऱ्या अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील बेसुमार वाळूतस्करी विरोधात कारवाईची अपेक्षा ठेवावी की नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.