मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज (दि. १९) दादरच्या शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आहे.
आज सकाळी ११ च्या सुमार या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून, या यात्रेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे अन्य दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “राज्यातली जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नाही..” असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तसेच नारायण राणे पुढे म्हणाले कि, “उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला सगळे उपस्थिती दिसत आहे.” असं देखील नारायण राणेंनी म्हंटल आहे.