मुंबई : आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात असून करोना संकटनानंतर पहिल्यांदाचा नागपूर येथे हे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनात शिंदे सरकारची कसोटी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी सीमाप्रश्न, ओलादुष्काळ, राज्यातील प्रकल्प यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.
नागपूर विमानतळावर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी “सीमाप्रश्नावर कर्नाटकातून आक्रमक भूमिका घेतली जात असून, आपलं घटनाबाह्य सरकार काही बोलत नाही. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेलेत, त्यावरही उत्तर देण्यात आलं नाही. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं, माझ्याशी माध्यमांसमोर येऊन चर्चा करावी. पण, अद्यापही ते झालं नाही,” असे म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली .
पुढे बोलताना आदित्य ठाकरे यांनी, “दोन-तीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला होता. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना कोणताही मदत झाली नाही,” असे सांगत कर्नाटक प्रश्नी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “हे सरकार घाबरट आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी धमकी दिल्यावर आपले दोन मंत्री घाबरून तिकडे गेलेच नाही. हे घटनाबाह्य सरकार लवकरच कोसळणार आहे,” अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली आहे.
दरम्यान, करोनाची साथ नियंत्रणात आल्याने नागपूर अधिवेशनासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरू आहे. अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली असून अधिवेशनानिमित्त येणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी सज्ज झाली आहे. पोलीस प्रशासनाने विधान मंडळ परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.