मुंबई: विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने सरकार विरोधात आंदोलन छेडले आहे. दरम्यान विरोधी पक्ष्याच्या नेत्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकासआघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याची टीका केली. तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाच्या प्रस्तावावरही या सरकारने स्थगिती आणेल, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईत भाजपने महाआघाडी सरकारविरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन आयोजित केले होते. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला जातात. आता नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी तुम्हाला समजली आहे. मात्र, तुमच्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनाही हे समजून सांगा.
मुंबईतील आझाद मैदानात एल्गार आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते.