नेवासा – ज्यांना शिवसेनेने मोठे केले ते सोडून गेले; मात्र संकटाच्या काळात आमदार शंकरराव गडाख यांनी मैत्री जपली. गडाख कुटुंबीयांनी शिवसेनेला दिलेली साथ व आमच्यावर दाखवलेला विश्वास कधीच विसरणार नाही, असे प्रतिपादन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले. नेवासा फाटा येथे शिवसंवाद यात्रा दरम्यान युवानेते आदित्य ठाकरे शिवसैनिक व नागरिकांशी संवाद साधतांना बोलत होते.
यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख मित्र मंडळ व तालुका शिवसेनेच्या वतीने युवानेते उदयन गडाख यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी चालू असलेल्या जोरदार पावसातही ठाकरे यांनी शिवसैनिकांबरोबर संवाद साधला. यावेळी अहमदनगर जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, उपनेते माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार उदयसिंह राजपूत, आमदार आंबदास दानवे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, सभापती रावसाहेव कांगुणे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, “आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई येथे शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समर्थनासाठी घेतलेली सभेने मला प्रोत्साहन, ऊर्जा व हिम्मत मिळाली. संकटात दिलेली साथ कधीही विसरणार नाही. सध्याचे सरकार हे अल्प आयुचे असून ते टिकणारे नाही. भर पावसात तुमचे आशीर्वाद घ्यायला या दौऱ्याच्या माध्यमातून आलो आहे.
शिवसंवाद यात्रे दरम्यान शिवसैनिक, सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे राज्यभरात मिळत असलेले प्रेम हे कशातच मिळणारे नाही. युवा नेते उदयन गडाख म्हणाले, “नेवासे तालुक्याची संपूर्ण ताकत ही शिवसेनेचे पाठीशी असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवानेते आदित्य ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून त्यांना खंबीर साथ देऊ अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.