सातारा – पंतप्रधान नरेंद्र मोदी, सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणण्यात येत आहेत. या गोष्टीचे कौतुक करायचे सोडून विरोधकांकडून मुद्दामहून विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाघनखं खरी आहेत का, हे आम्हाला विचारण्यापेक्षा आमदार आदित्य ठाकरे यांनी ती खोटी आहेत, हे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हान आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.
दरम्यान, मराठी माणसांची अस्मिता याच्याशी जोडली आहे, त्यामुळे विरोधकांनी वाघनख्यावरुन राजकारण करु नये. महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व परिसराची स्वच्छता केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांनी वाघनखांवर उपस्थित केलेल्या प्रश्नाबाबत ते म्हणाले, “लंडन येथे असलेली वाघनखं भारतात आणली जाणार आहे. तत्पूर्वीच विरोधकांकडून या विषयाचे राजकारण सुरू झाले आहे, हे योग्य नाही.’
ज्या गोष्टीशी मराठी माणसांची अस्मिता जोडली गेली आहे, त्याचे राजकारण न करता आदित्य ठाकरे यांनी मुंबईत येऊन वाघनखांचं स्वागत अन पूजन करावं, दर्शन घ्यावं, असा सल्ला त्यांनी दिला. वाघनखं भारतात आल्यानंतर साताऱ्यातही त्यांची मिरवणूक काढण्यात येईल, त्यावेळी त्याचे विधीवत पूजन करण्यात येईल, त्यानंतर शासन जिथे वाघनखे ठेवेल तेथे येवून शिवभक्तांनी दर्शन घ्यावे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
माजी नगरसेवक अविनाश कदम, माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील, अमित महिपाल, माजी नगरसेवक धनंजय जांभळे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, फिरोज पठाण, रवि पवार आदी उपस्थित होते.
“शिवतीर्थ’ची स्वच्छता
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी रविवारी सकाळी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच शिवतिर्थ परिसरासह पोवईनाका येथील राजधानी या सेल्फी पॉईंटचीही स्वच्छता केली. भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, शहरवासियांनी स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. आज शहरातील शाळांनीही मोदी यांच्या आवाहनाला उत्सफूर्तपणे प्रतिसाद देत परिसर स्वच्छता मोहिम राबवली आहे.