ठोसेघर – जवळपास गेला महिनाभर दडी मारलेल्या वरुणराजाने गेल्या काही दिवसांपासून केलेले दमदार पुनरागमन आणि सलग सुट्ट्यांमुळे कास पठार आणि ठोसेघर धबधबा ही निसर्गरम्य ठिकाणे पर्यटकांच्या गर्दीने बहरली आहेत. त्यामुळे कास रस्त्यावर रविवारी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
सातारा शहराच्या पश्चिमकडील निसर्गसंपदेने नटलेला भाग गेल्या काही वर्षांपासून देशभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. जागतिक वारसास्थळ कास पुष्पपठार, कास तलाव , जगातील सर्वात उंच भांबवलीचा वजराई धबधबा, ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीचा काळ्या कातळावर विर्स्तीण पसरलेला पवनऊर्जा प्रकल्प या स्थळांना पावसाळी पर्यटन हंगामात हजारो पर्यटक भेट देतात.
यंदा गणेश विसर्जनानंतर सलग आलेल्या सुट्ट्या, ऐन बहरात आलेला कास पठारावरील फुलांचा हंगाम आणि दडी मारलेल्या वरुणराजाची गेल्या काही दिवसांपासूनची दमदार हजेरी यामुळे फेसाळलेले ठोसेघर, वजराई येथील धबधब्यांकडे पर्यटकांचा ओढ वाढला आहे. संपूर्ण राज्यभरासह काही देशीविदेशी पर्यटकांची येथे वर्दळ वाढली आहे. पर्यटकांनी मोठ्या संख्येने रविवारी लावलेल्या हजेरीमुळे सातारा शहराकडून कास पठार आणि ठोसेघरकडे जाणाऱ्या रस्त्यावर समर्थ मंदिर ते बोगदा आणि बोगदा ते यवतेश्वर घाट येथे रविवारी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या.
आल्हाददायक वातावरण
पावसाच्या दमदार हजेरीमुळे ठोसेघर, कास परिसरातील वातावरण आल्हाददायक झाले आहे. अंगाला झोंबणारे थंडगार वारे, पावसाच्या रिपरिपीमुळे धुक्याच्य दुलईत हरवलेला रस्ता आणि डोंगररांगा, जागोजागी खळखळून वाहणारे ओढे-नाले अन् सर्वत्र पसलेली हिरवाईची चादर यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत.
पोलिसांच्या दुर्लक्षामुळे पर्यटकांची गैरसोय
कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यापासून पोलीस दलाचे दुर्लक्ष झाले आहे. सुट्ट्यांमध्ये या ठिकाणी हजारो पर्यटक येत असल्याने वाहतूक कोंडी होते. त्यात हुल्लडबाजांचा त्रास, बेदरकार वाहनचालकांमुळे पर्यटनाला गालबोट लागण्याची शक्यता आहे. वास्तविक या ठिकाणी पोलिसांची करडी नजर असायला हवी. मात्र, सलग सुट्ट्या असूनही पोलिसांनी कानाडोळा केल्याने पर्यटकांची गैरसोय होत आहे.