मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे येथील सभेत मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, मशिदींच्या भोंग्यासंबंधी सर्व मशिदींना 3 मे पर्यंत मुदत देतो, या नंतर जर कोणी भोंगे काढले नाहीत तर देशभर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्यात येणार, असा इशारा ठाकरे यांनी दिला.
राज ठाकरेंच्या या भूमिकेवरुन अनेक प्रतिक्रिया येत असतानाच आता राज ठाकरेंचे पुतणे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे
‘राज ठाकरेंच्या या भूमिकेवर मला जास्त काय बोलायचं नाही. त्यांनी यापेक्षा जनतेला महागाईबद्दल सांगता आलं तर सांगावं. कारण सध्या पेट्रोल-डिझेल, सीएनजीच्या या किमती वाढल्या आहेत. ही दरवाढ कशामुळे का झाली आहे. साठ वर्षांपूर्वी न जाता गेल्या दोन-तीन वर्षांत हे का झालं आहे? हे सुद्धा सांगावं असा रोकठोक प्रश्न आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना विचारला आहे.
ते पुढे म्हणाले,’भोंग्यातून वाढलेल्या किमतींबद्दलही लोकांना सांगता आलं तर हेही सांगावं की पेट्रोल-डिझेलची, सीएनजीची दरवाढ कशामुळे झाली? आणि ६० वर्षांपूर्वी न जाता गेल्या २-३ वर्षांत काय झालं हे सांगावं’ असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.