पुणे – मध्य रेल्वेची विस्कळीत सेवा आणि सततच्या पावसाने आठवडाभरापासून प्रवाशांचा गोंधळ उडालेला आहे. यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यासाठी व गैरसोय टाळण्यासाठी पुणे स्टेशन आणि स्वारगेट स्थानकावरून जादा एसटी बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे स्टेशन येथून राज्यभरात 30 ते 40 जादा बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. मात्र, प्रवाशांची गर्दी जास्त असल्यास 80 पर्यंत गाड्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती, आगारप्रमुख अनिल भिसे यांनी दिली. दरम्यान, स्वारगेट येथूनही मुंबई व मुंबई उपनगर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने एस.टी बसची संख्या वाढविल्याची माहिती, स्वारगेट आगारप्रमुख प्रदीपकुमार कांबळे यांनी सांगितले.