नवी दिल्ली – सध्या घोटाळ्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीत गेलेल्या अदानी समूहाला आज सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका निकालामुळे झटका बसला आहे. या समूहाच्या चेन्नईत उभारण्यात आलेल्या तेलाच्या टाक्या आणि पाइपलाइन तोडून टाकण्याचा हरित लवादाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्यामुळे त्यांना आता तेथील ही कामे तोडून टाकावी लागणार आहेत.
चेन्नई बंदरापासून चार किमी अंतरावर एन्नोर द्रुतगती मार्गावर केटीव्ही ऑईल मिल्स आणि केटीव्ही मिल्स या दोन कंपन्यांच्या वतीने तेल साठवणुकीच्या टाक्या व पाइपलाइन उभारली होती. या दोन्ही कंपन्या अदानी समूहातील अदानी विल्मरच्या कंपन्या आहेत. कंपनीने या प्रकल्पासाठी किनारपट्टी नियमन विभागाची मंजुरी घेतलेली नव्हती. त्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात एका स्वयंसेवी संस्थेने हरित लवादाकडे धाव घेतली होती.
तथापि सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने अदानी समूहावर मेहरनजर दाखवत किनारपट्टी नियमन अधिक्षेत्राच्या अधिसूचनेत बदल करून या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. तथापि हरित लवादाने प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याला मंजुरी घेणे हे बेकायदेशीर असल्याचे नमूद करीत हा प्रकल्प रद्दबातल ठरवला होता व तेथील टाक्या व पाइपलाइन तोडण्याची सूचना केली होती.
त्याविरोधात कंपनीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, परंतु त्यांना तेथेही दिलासा मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयाने हरित लवादाचा निर्णय कायम ठेवत हे काम पाडून टाकण्याची सूचना केली आहे.