मुंबई – ‘अगले जनम मोहे बिटिया ना कीजो’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री रतन राजपूत सर्वांना परिचयाची आहे. अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून अभिनयापासून दूर आहे, पण ति तिच्या रोजच्या ब्लॉगद्वारे नवीन काही ना काही लिहीत असते. ती तिच्या चाहत्यांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करते. आता अभिनेत्री पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे आणि तिने अभिनयातून ब्रेक घेण्याचे कारण देखील सांगितले आहे. यासोबतच तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबत धक्कादायक दावा केला असून ती कधीही साऊथ चित्रपटांमध्ये काम करण्यास तयार होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एका घटनेचा संदर्भ देत रतन म्हणाली, ‘दक्षिणात्य इंडस्ट्रीचे नाव खूप आहे. मी ‘अगला जनम’ करत होते, मला दक्षिणेतून खूप फोन आले. खूप चांगले दिग्दर्शक चालून आले, पण त्यासोबत हेही सांगण्यात आले की तुला तुझे वजन थोडे वाढवावे लागेल, तू खूप पातळ आहेस. असं म्हणत तिने एक किस्सा सांगितलं ती म्हणते मला एकाने म्हंटले,’तुम्हाला साऊथ इंडस्ट्रीचे नियम माहित असले पाहिजेत. आता इंडस्ट्रीतील प्रत्येकाला हे माहित आहे. दिग्दर्शक, निर्माता आणि मुख्य अभिनेता, कदाचित डीओपी देखील…’ हे ऐकल्यानंतर रतनने प्रश्न विचारला की मला माहित नाही ? पूर्ण सांगा. ज्यावर तिला उत्तर मिळाले, ‘आपको तो पता होणं चाहिये है.. यह चलता है कॉम्प्रोमाइज’.
त्यानंतर तिने या चित्रपटासाठी नकार दिला. ती पुढे म्हणते की, हे केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर साऊथच्या चित्रपटांमध्येही घडते. ती पुढे म्हणते, ‘आजपर्यंत साऊथमधून असा एकही कॉल आलेला नाही जिथे कॉम्प्रोमाइजची चर्चा झाली नसेल. कधीकधी या यादीत डीओपी नसतो, परंतु निर्माता, दिग्दर्शक आणि नायक या यादीत नेहमीच असतात. यानंतर मी ठरवले आहे की मी कधीही साऊथ इंडस्ट्रीत काम करणार नाही. ती म्हणते की इंडस्ट्रीत चांगले आणि वाईट दोन्ही लोक असतात.
जेव्हापासून रतन राजपूतने स्वतःला अभिनयापासून दूर केले आहे, तेव्हापासून अभिनेत्री ब्लॉग बनवत आहे ज्यावर ती तिचा दैनंदिन प्रवास लोकांसोबत शेअर करते. यावेळी अभिनेत्रीने यादरम्यान खूप प्रवास केला. तिने पुन्हा अभ्यास सुरू केला आणि कुटुंबासोबत वेळ घालवला. भूतकाळ तिच्यासाठी सोपा नव्हता. तिने तिचे वडील देखील गमावले होते, ज्यानंतर ती खूप अस्वस्थ होती.