मुंबई – रायगड जिल्ह्यामध्ये खालापूरजवळील इर्शाळवाडी मध्ये माळीण घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. इर्शाळवाडी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान घडली आहे. दरड कोसळून अनेक घरं मलब्याखाली गेली होती.
यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इर्शाळवाडी मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. आवाज या ठिकाणचं सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं असल्याचं सांगितलं गेलं आहे.
सर्च ऑपरेशन आजपासून थांबवण्यात आल्याचं पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. खालापूर पोलिस ठाण्यात सर्व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
दरम्यान, इर्शाळवाडीत आतापर्यंत 27 मृतदेह सापडले आहेत. परंतु 57 जण बेपत्ता आहेत. त्यांना मृत घोषित करून आजपासून एनडीआरएफचे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले आहे.
तसेच, बचावलेल्या 144 लोकांचे लवकरात लवकर पुनर्वसन केले जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले. रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर सध्या दुखाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांमध्ये देखील चिंतेचे वातावरण आहे.