मुंबई – अभिनेता आमिर खानचे चित्रपट नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आपटला. ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर काही काळ अभिनयातून ब्रेक घेणार असल्याचे आमिरने सांगितले होते. त्यानंतर आता आमिर मेडिटेशनसाठी नेपाळला गेला आहे.
रविवारी आमिर काठमांडू विमानतळावर पोहोचला आणि तिथून तो ध्यान शिबिरासाठी रवाना झाला आहे. आमिर खान हा नेपाळमधील ‘बुधनिलकंठ’ याठिकाणी विपश्यना केंद्रात 10 दिवस ध्यानसाधना करणार आहे. या ठिकाणी 10 दिवस बाहेरील जगाशी कोणताच संपर्क केला जात नाही. त्यामुळे कोणताही ताण न घेता केवळ मनाच्या शांतीसाठी आमिर या ठिकाणी काही दिवस वास्तव करणार आहे.
दरम्यान, आमिर खान पुढील दीड वर्ष अभिनयातून ब्रेक घेणार आहे. त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार आले आहेत. मागील वर्षीच त्याचा पत्नी किरण रावसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर आमिरने हा निर्णय घेत काही काळ सर्व गोष्टींपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. कामातून काही काळ ब्रेक घेऊन कुटुंबीयांना वेळ देणार असल्याचे यामागचे कारण असल्याचे आमिरने सांगितलं होतं.
एका मुलाखतीत आमिर म्हणाला होता की, “जेव्हा मी अभिनेता म्हणून चित्रपटात काम करतो, तेव्हा त्या कामात मी पूर्णपणे व्यस्त होऊन जातो. याच कारणामुळे मी काही काळ ब्रेक घेत आहे. आता मला माझ्या कुटुंबीयांसोबत राहायचे आहे. गेल्या 35 वर्षांपासून मी फक्त कामच करत आहे. मी फक्त माझ्या कामाकडेच पूर्ण लक्ष देत असून माझ्या जवळच्या व्यक्तींकडे दुर्लक्ष करत आहे. जे योग्य नाही.” काही काळ कुटूंबासोबत वेळ घालवल्यानंतर आता ध्यानधारणा करण्यासाठी आमिर रवाना झाला आहे.