कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची वक्तव्यं, जत तालुक्यात पाणी सोडण्याचा खटाटोप, सीमावर्ती गावांनी कर्नाटकात जाण्याची दाखवलेली तयारी या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेजवळ वातावरण तापलं. कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावजवळ टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केल्यावर आता वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवल्याचा आरोप झाला आणि राज्याची उत्तर सीमाही धगधगू लागली. याही भागातल्या काही गावकऱ्यांनी गुजरातमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे महाराष्ट्रासमोर “इकडे आड, तिकडे विहीर’ अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून बोलायचं झालं, तर आपल्याला कर्नाटकात, तेलंगणात किंवा गुजरातेत जायचं आहे, असं सीमावर्ती भागातल्या गावकऱ्यांनी उघडपणे म्हणण्याची बहुधा ही पहिलीच वेळ!
कर्नाटकालगत असलेल्या सीमाभागाचा वाद जुनाच आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात असं वितुष्ट कधीच नव्हतं. पण त्या राज्यानं महाराष्ट्रातले अवाढव्य उद्योग पळवल्याचा आरोप जसा झाला, तसं वातावरण तापलं. उद्योग गेल्याचं दुःख बाजूला ठेवून राजकारणी मंडळींनी ते कुणाच्या कार्यकाळात गेले, हे पटवून देण्यासाठी कौशल्य पणाला लावलं. “”याहून मोठे उद्योग महाराष्ट्रात येणारंयत,” असं “लॉलिपॉप’सुद्धा देऊन झालं. बहुधा 2024 च्या दरम्यान आपल्याकडे काही उद्योग येतील, किमान तशी घोषणा तरी करतील, एमओयू करतील, हे भाकित वर्तवण्यासाठी उद्योग क्षेत्रातील नव्हे, राजकीय क्षेत्रातील कौशल्य असणं आवश्यक आहे.
असो, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशी “देवाणघेवाण’ अपेक्षितच आहे, असं गृहित धरलं तरी देणं आणि घेणं समान हवं, अशी किमान अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नसावी. थोडक्यात “आवळा देऊन कोहळा काढणं’ असता कामा नये. आता हेच पाहा ना… गुजरातने केवळ उद्योग नेलेले नाहीत. ताडोबा-अंधारी प्रकल्पातले हत्तीही नेलेत. येत्या पंधरवड्यात औरंगाबादमधून दोन वाघ गुजरातला नेले जाणारंयत. पण मोबदल्यात महाराष्ट्राला मिळणारंय काय? कोल्हा आणि इमू…? “इमू’ हा शब्द जरी उच्चारला तरी चप्पल हातात घेणारे असंख्य महाभाग महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भेटतील.
“इमूपालन करा’ अशी जाहिरात करून अनेक कंपन्यांनी हा धगुरडा पक्षी शेतकऱ्यांच्या गळ्यात मारला आणि अंडी किंवा पक्षी विकत घेणार, असं सांगून, फसवून पोबारा केला. इमूचा आहार पाहता वैतागलेल्या शेतकऱ्यांनी अखेर इमू डोंगरात सोडून दिले. वाघाच्या मोबदल्यात हा पक्षी स्वीकारायचा? वाघ आणि हत्तींसारख्या राजस प्राण्यांच्या मोबदल्यात कोल्हा स्वीकारायचा? हत्तीच्या वजनाइतके कोल्हे दिले असते तरी गेम बरोबरीत सुटला असता हो..! अक्राळविक्राळ आणि शूर वन्यजीवांच्या मोबदल्यात धूर्त (कधी-कधी लबाड) प्राणी देण्यामागे काही राजकारण तर नाही ना? असा प्रश्न आजच्या वातावरणात पडणं स्वाभाविक आहे.
प्राण्यांची देवाणघेवाण करण्यात काही गैर नसेल, तर आमच्याकडे बाहेरून आलेल्या एकमेव प्राण्याची- पेंग्विनची टिंगल का झाली? त्याने तर थंडगार ध्रुवीय प्रदेशातून मुंबईसारख्या हॉट शहरात येऊन, कृत्रिम वातावरणात राहूनसुद्धा वंश वाढवण्याची क्षमता नुकतीच सिद्ध केलीये. आता आफ्रिकेतून आलेल्या चित्त्यांची परीक्षा आहे. अर्थात, कुठलाही प्राणी कुठेही गेला, तरी आपला स्वभाव सोबत नेतो. माणूस कंपू बदलला की विचार बदलतो, हे पाहून प्राणी खरोखर हसत असतील.