साखर आयुक्तांचा कारखान्यांना इशारा : व्याज मिळवून देण्याची जबाबदारी संचालकांवर
पुणे – साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीवरील व्याजाच्या रक्कम वाटपात होणारी टाळाटाळ चांगलीच महागात पडली आहे. शेतकऱ्यांच्या एफआरपी रकमेवरील व्याज तत्काळ संबंधित शेतकऱ्यांना देण्याचे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. हे व्याज वसूल करण्याची जबाबदारी त्यांनी संबंधित साखर सहसंचालकांवर सोपविली आहे. या बाबतचा वेळोवेळी आढावादेखील घेतला जाणार आहे. व्याज न देणाऱ्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यात साखर कारखानदारीचा मोठा दबदबा आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यातील साखर कारखाने आणि राजकारण असे समीकरण ठरलेले आहे. या साखर कारखान्यांना ऊस उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना ऊसविक्रीनंतर एफआरपीची रक्कम 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. मात्र, साखर कारखान्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीय ही रक्कम टप्प्या-टप्प्याने देण्याचाप्रस्ताव मंजुर करून शेतकऱ्यांना कारखान्यात खेटे घालायला लावण्याचा प्रकार संचालकांकडून केला जात होता.
अनेक कारखान्यांनी सन 2014-15 च्या गळीत हंगामाची एफआरपी मिळविण्याकरिता उस उत्पादक शेतकऱ्यांना साखर आयुक्तांकडे धाव घ्यावी लागली होती. त्यानंतर ही रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती. मात्र, त्यावरील व्याजासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या एफआरपीवरील व्याज थकविणाऱ्या सर्व साखर कारखान्यांची माहिती संकलित करून त्या विभागाची जबाबदारी असलेल्या साखर सहसंचालकांकडे पाठविण्यात आली आहे. या सर्व शेतकऱ्यांना व्याज मिळवून देण्याची जबाबदारी या सहसंचालकांवर सोपविण्यात आली आहे.
आयुक्तांनी घेतली कठोर भूमिका
व्याजाच्या रकमेबाबत साखर आयुक्तांनीदेखील कठोर भूमिका घेतली आहे. सर्व कारखान्यांनी एफआरपीची माहिती साखर सहसंचालकाकडे देण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना हे व्याज जास्तीत जासत तीन महिन्यांत द्यावे, असेही आदेशात म्हटले आहे. व्याजाची रक्कम न दिल्यास साखर कारखान्याच्या जप्तीची कारवाई करून रक्कम वसूल केली जाईल, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.