पुणे : मार्केट यार्डातील फळे व भाजीपाला विभागातील गाळ्यावर डमी आडत्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गाळ्यावरील नियमबाह्य डमी आडत्यांवर आज (मंगळवार दि. ५) पासून बाजार समिती प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत असलेल्या १५ फुटांच्या नियमाबाबतही रोजच कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी उपसभापती सारिका हरगुडे, संचालक दत्तात्रय पायगुडे, संचालिका मनीषा हरपळे आदी उपस्थित होते. डमी आडत्यांमुळे बाजारात दिवसभर किरकोळ विक्री सुरू होती, तसेच डमी आडते गाळ्यासमोरील १५ फुटांचा नियम पाळत नसल्याने बाजारात वाहतूक कोंडी होत होती.
त्यामुळे डमी आडत्यांना आळा घालण्यासाठी एका गाळ्यावर दोन मदतनीस ठेवता येतील, असा निर्णय बाजार समिती संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, पुन्हा डमी आडत्यांची संख्या पुन्हा वाढल्याने कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे काळभोर यांनी नमूद केले.
काळभोर म्हणाले, प्रत्येक गाळ्यावरील डमी आडत्यांची पाहणी केली जाणार आहे. गाळ्यावर नियमबाह्य डमी आडते आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाईल, तसेच गाळाधारकांनी १५ फुटांपेक्षा अधिक जागेवर माल लावल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
गाळ्यावरील डमी आडत्यावर कारवाई करण्याची जबाबदारी बाजार समिती अधिकारी व कर्मचार्यांवर सोपविली जाणार आहे. १५ फुटांचा नियम मोडणार्या आडत्यांची दंडाची पावती केली जाणार आहे. डमी आडते आणि १५ फुटांच्या नियमाबाबतच्या कारवाईचा आढावाही घेतला जाणार असल्याचे काळभोर यांनी सांगितले.
गाळामालकाला नोटीस
फळबाजारात एका डमी आडत्याने शेतकर्यांना मारहाण केल्याचा नुकताच प्रकार उघडकीस आला आहे. त्या डमी आडत्याला बाजार प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे, तसेच ज्या गाळ्यावर डमी आडत्या होता, त्या गाळा मालकाला नोटीस देऊन खुलासा मागविला आहे.
खुलासा समाधानकारक न वाटल्यास काही दिवस परवाना रद्दची कारवाई केली जाईल. ज्या शेतकर्यांना मारहाण झाली, त्या शेतकर्यांनीच तक्रार देण्यास नकार दिला आहे. त्या शेतकर्यांनी मारहाण झाल्याची तक्रार दिल्यास पोलीस कारवाई करता येईल, अशी माहिती सभापती दिलीप काळभोर व सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी दिली.