पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांची कामगिरी : दहा लाखांचा दंड वसूल
पिंपरी – 1 ते 15 फेब्रुवारी दरम्यान गेल्या 15 दिवसांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या विशेष कारवाईमध्ये तीन हजार 436 वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच या वाहन चालकांकडून दहा लाख 31 हजार रुपयांचाही दंड वसूल केला. नो-एन्ट्रीतून येणारे वाहन चालक अपघातास कारणीभूत ठरतात. यामुळे स्वतःचा आणि इतरांचाही जीव धोक्यात आणतात.
माजी पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी अशा वाहन चालकांवर भा.द.वि. 279 कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना बक्षीसही जाहीर केले होते. यामुळे नो-एन्ट्रीतून येणाऱ्या वाहनांची संख्या घटली होती. पदम्नाभन निवृत्त झाल्यानंतर ही योजना बासनात गुंडाळली गेली. त्यानंतर आता पुन्हा वाहतूक पोलिसांनी नो-एन्ट्रीतून येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
गेल्या15 दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांनी तब्बल एक हजार 358 जणांवर कारवाई केली. या वाहन चालकांकडून एक लाख 35 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच नो इंट्रीसह इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे साडे तीन हजार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाई अंतर्गत दहा लाखांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
बाराशे चारचाकींच्या काळ्या फिल्म काढल्या
संभाव्य घातपाती कारवाया टाळण्यासाठी चारचाकी वाहनांच्या काचा फिल्म लावून काळ्या करू नयेत, असे आदेश दिले होते. मात्र तरीही अनेकजण उन्हापासून बचाव करण्यासाठी वाहनांना काळ्या फिल्म लावून घेतात. गेल्या 15 दिवसांमध्ये अशा एक हजार 241 वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या वाहन चालकांकडून दोन लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. तसेच वाहतूक पोलिसांनी जागीच या वाहनांच्या काचांवर लावलेल्या फिल्म काढून टाकल्या. याच कालावधीत अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या 642 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या वाहन चालकांकडून सहा लाख 47 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
195 तळीरामांवर खटले
दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अनेकदा अपघात होतात. अशा वाहन चालकांवर न्यायालय कडक कारवाई करते. गेल्या 15 दिवसांमध्ये दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या 195 जणांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या वाहन चालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.