सातारा -सोमवारी दुपारी जिल्हा शांतता कमिटीच्या झालेल्या बैठकीत डॉल्बीच्या आवाजाच्या डेसिबलचा डेमो देत गणपती उत्सव काळात त्याचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराच जिल्हा प्रशासनाने दिला. डॉल्बी लावावी असा एक गट मागणी करत असताना डॉल्बी लावू नये असे सूचवताच बैठकीतच तणातणी होवून गोंधळ उडाला. दरम्यान, सातारा जिल्ह्याला शांततेची परंपरा असून ती जोपासली जावी, असे आवाहन खा, श्रीनिवास पाटील यांनी केले.
येथील पोलिस करमणूक केंद्रामध्ये शांतता कमिटीची बैठक झाली. यावेळी खा.श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, तहसीलदार राजेश जाधव, मुख्याधिकारी अभिजीत बापट उपस्थित होते.
शांतता कमिटीच्या बैठकीच्या सुरुवातीला उपस्थितांना सूचना करण्याची विनंती करण्यात आली. यावेळी प्रामुख्याने सर्वांनीच 2 बेस व 2 टॉपला परवानगी मिळावी. तसेच डेसिबील म्हणजे काय? डेसिबल मोजण्याची प्रक्रिया कशी आहे? एमएसईबीने जुने डिपॉझिट परत करावीत. जिल्हा शांत आहे म्हणून दाबू नका. गौण खनिज वाहतुक सुरु असलेल्यांवर कारवाई करावी.
अमृत महोत्सवानिमित्त प्रशासनाने विषय सूचवून त्यांना प्रशासनाने चांगली रक्कम देवून गणराया ऍवॉर्ड द्यावा. कुत्र्यांचा सातार्यात सुळसुळाट असून त्यावर पालिकेने प्रभावी कारवाई करावी. करंजे मधील अतिक्रमण काढावीत. अफलज खान वध देखाव्याला मान्यता मिळावी, अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. नगरसेवक अविनाश कदम, धनंजय जांभळे, श्रीकांत शेटे, अरबाज शेख, ऍड. विनीत पाटील, पूजा बनसोडे, हेमंत सोनावणे, संतोष प्रभुणे, चिन्मय कुलकर्णी, मधुकर शेंबडे, गणेश दुबळे यांनी सूचना केल्या.खा. श्रीनिवास पाटील बोलताना म्हणाले, दोन वर्षे कोरोना असल्याने उत्सव साजरे झाले नाहीत. यामुळे यंदा आम्हाला नाचायचे आहे, असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजवून त्याला दाद दिली.
उत्सव साजरा होताना सातारा जिल्ह्याच्या परंपरेचा इतिहास असून तो सर्वांनी अबाधित ठेवण्याची गरज आहे. नाव लौकीकाला बाधा येणार नाही, असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये, असे खा. पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, राज्यात गेली 10 वर्षे काम केले आहे. सातारा बद्दल खूप ऐकून आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. नियम व अटींचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्याधिकारी अभिजीत बापट म्हणाले, खड्डे बुजवण्याचे काम सुरु आहे. पावसामुळे अडथळा येत असून राहिलेली कामे लवकर पूर्ण करणार. कृत्रिम तळी उभारली जाणार आहेत. सातार्यातील काही तळी खासगी असल्याने व न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर मर्यादा आहेत.