मुंबई- करोनाच्या उपाययोजनांसाठी आरोग्य सुविधांची उभारणी करताना मुंबईत मोकळ्या मैदानावरील क्षेत्रीय रुग्णालयात अतिदक्षता विभागाचे (आयसीयू) बेडस् निर्माण करण्याची किमया यंत्रणांनी केली आहे. महाराष्ट्राने देशासमोर अभिनव अशी यशोगाथा मांडली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्या वतीने बीकेसी मैदानावर दुसऱ्या टप्प्यात उभारण्यात आलेल्या करोना रुग्णालयाचा हस्तांतरण कार्यक्रम आणि ठाणे येथे उभारण्यात आलेल्या 1000 खाटांचे करोना रुग्णालयाचा ई-लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आदी सहभागी झाले होते.
ठाकरे म्हणाले, बीकेसी मैदान आणि ठाणे येथे ही दोन्ही रुग्णालये युद्धपातळीवर उभारण्यात आली आहेत, याचा मला अभिमान आहे. करोनाच्या उपाययोजनांमध्ये महाराष्ट्र जगाच्या मागे नाही तर पुढे आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत मुंबईसह राज्यात काही लाख खाटा उपचारासाठी निर्माण केल्या गेल्या ही मोठी गोष्ट आहे.
मुंबईमध्ये मोकळ्या मैदानांवर 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत 1000 खाटांचे सर्व सुविधांयुक्त रुग्णालयांची निर्मिती होते ही कामगिरी थक्क करणारी आहे. देशात अन्यत्र कुठेही अशा प्रकारच्या मोकळ्या मैदानावरील रुग्णालयात आयसीयूची सुविधा उपलब्ध नाही. महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीची सचित्र माहिती आपण पंतप्रधानांशी संवाद साधताना देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात डॉक्टर्स, नर्स हे करोना योद्धे लढताहेत त्यांना आयुधं म्हणून या आरोग्य सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.
दाट लोकवस्तीत राहणाऱ्या 55 वर्षांवरील व्यक्तींची तपासणी केली जात आहे. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात आहे, जेणेकरून अशा व्यक्तींना करोनाच्या प्रादुर्भावापासून वेळीच रोखणे शक्य होईल. ट्रॅकिंग, ट्रेसिंगचा मालेगाव आणि धारावीमध्ये यशस्वी झालेल्या प्रयोगाचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.